रोजगार देण्याच्या राज्यमंत्री देसाई यांच्या सूचना
पुणे – लॉकडाऊनच्या काळात पुणे-मुंबई शहरातून ग्रामीण भागात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू झाला आहे. या तरुणांना भविष्यात ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी कशा उपलब्ध होतील, याचे नियोजन कौशल्य विकास विभागाने करावे. तसेच डोंगराळ, दुर्गम व आदिवासी भागातील शेती व शेती व्यवसायाशी निगडीत प्रकल्पांना चालना देऊन या तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्यासाठीचा दिशादर्शक प्रस्ताव कौशल्य विकास विभागाने सादर करावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री तथा कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच वित्त विभाग, कौशल्य विकास विभाग, जीएसटी विभाग या विभागांचा आढावा देसाई यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत. बहुतेक कंपन्या या ग्रामीण भागात आहेत.
अनेक कंपन्यांमध्ये आवश्यक ते मजूर उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा. लॉकडाऊनच्या परिस्थितीत रोजगार आणि व्यवसायासाठीचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात यावे, अशा सूचना देसाई यांनी दिल्या.