मुंबई – देशभरात सुरू असलेल्या करोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आघाडी कायम राखली आहे. राज्यात नऊ कोटींहून अधिक नागरिकांचा करोना लसीचा किमान एक डोस पूर्ण झाला आहे. हे प्रमाण कोणत्याही राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. राज्यात बुधवारी संध्याकाळपर्यंत नऊ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले असून यापैकी 2.76 कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
असे असले तरी लस घेण्यास आजही काही लोक भिताना दिसतात. लस घेण्यास टाळाटाळ करण्याच्या अनेक घटना आता पर्यंत पुढे आल्या आहे. अशी एक घटना मुंबईतील डोंबिवली येथील एक लसीकरण केंद्रावर घडली आहे.
डोंबिवली पूर्वेकडे नेहरू मैदानात पालिकेने लसीकरण केंद्र सुरू केले आहे. येथे गुरुवारी लस घेण्यासाठी आलेल्या ऋषीकेश मोरे या 29 वर्षीय तरूणाने दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले. मात्र त्यांनतर तो लस न घेताच निघून जाऊ लागला.
सेंटरवरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ऋषिकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्वच्छतागृहात जाऊन येण्याचा बहाना केला असता कर्मचाऱ्यांनी त्याला लस टोचून घेतल्या नंतर जाण्यास सांगितले. यानंतर तो चक्क पळून जाऊ लागला. तेव्हा सेंटरवर असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ढकलून देत तो लस न घेताच पळून गेला. या घटनेमुळे लसीकरण केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता.