कोल्हापूर: लग्नात झालेल्या चोरीचा संशयावरून एका तरुणाचा दगड, विटा आणि धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. सोमवारी रात्री गडमुडशिंगीत ही घटना घडली आहे. ऋषिकेश अशोक कांबळे (वय,22 रा. आंबेडकर चौक, गडमुडशिंगी) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पंकज दिलीप कांबळे, पद्मजित दिलीप कांबळे, रोहित मोहन कांबळे या तिघा संशयिताना गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित पद्मजित कांबळे याच्या लग्नात चोरी झाली होती. ही चोरी मयत ऋषिकेश अशोक कांबळे याने चोरी केल्याचा संशय घेतला होता. तेव्हापासून संशयित आरोपी मयत ऋषिकेश याच्यावर चिडून होते. सोमवारी रात्री 11 वाजता संशयित पद्मजित याच्या हुडा गल्लीतील घरासमोरून जात होता. त्याचवेळी पद्मजितने धारदार चाकूने पाठीवर आणि छातीवर सात वार केले. तसेच इतर तिघा संशयितांनी दगड, विटांनी डोक्यावर छातीवर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. चाकूचा वार पोटात खोलवर झाल्याने ऋषिकेश गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान मृत ऋषिकेशच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी गडमडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. ऋषिकेशची प्रकृती खालावत चालल्याने त्याला कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, ऋषिकेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबतची फिर्याद ऋषिकेशचा भाऊ विनायक अशोक कांबळे यांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार संशयित पंकज दिलीप कांबळे, पद्मजित दिलीप कांबळे, रोहित मोहन कांबळे आणि दिलीप यल्लापा कांबळे (सर्व रा. गडमुडशिंगी ता. करवीर) यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मंगळवारी सकाळी पंकज दिलीप कांबळे, पद्मजित दिलीप कांबळे, रोहित मोहन कांबळे या तिघा संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. तर दिलीप यल्लपा कांबळे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असलेने, त्याला अजून अटक करण्यात आलेले नाही.