जामखेड – उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय-४०, ता.जामखेड) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
यामध्ये बाळू गंभीर जखमी झाला असून त्याला खर्डा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर बार्शी येथे दाखल केले आहे. मात्र त्याचा बुधवारी मृत्यू झाला. याबाबत मयताची मावशी वेणुबाई बाजीराव काळे हिने जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. यानुसार सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे सर्व राहणार खर्डा या पाच जणांविरोधात खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सर्व आरोपी फरार आहेत.
सदर सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल दाखल झाले आहे.
घटनास्थळी शेवगाव पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, निलेश कांबळे व पोलीस फौजफाटा आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील खर्डा येथे दाखल झाले आहेत.