राहुरी – लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत नैराश्य आलेल्या राहुरी येथील 35 वर्षीय खाणकाम करणाऱ्या तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
बाळू रामभाऊ गुंजाळ (रा. मुलनमाथा, राहुरी) असे आत्महत्या केलेल्या मजूर तरूणाचे नाव आहे. हा तरूण खाणकाम करून आपल्या कुटूंबाचा
उदरनिर्वाह करत होता. गेल्या अडीच महिन्यांपासून करोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू गुंजाळ याला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून काही कामधंदा नव्हता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती संकटात आली होती.
त्यामुळे कुटूंबातील पत्नी, दोन मुले, आई, वडील यांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. शेवटी परिस्थितीला कंटाळून बाळू गुंजाळ 27 मे रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान कोणाला काही न सांगता घरातून निघून गेला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तो हरवल्याची खबर राहुरी पोलिसांत दिली.
दरम्यान त्याचे नातेवाईक सोन्याबापू धोत्रे, किरण शिंदे, शिवाजी धनवटे, सुजित धोत्रे आदी शोध घेत असताना राहुरी शहर हद्दीतील पिंपळाचा मळा रोड लगत असलेल्या इनामदार यांच्या विहीरीच्या काठावर बाळू गुंजाळ याच्या चपला दिसून आल्या.
म्हणुन त्यांनी विहीरीमध्ये डोकावून पाहिले असता बाळू गुंजाळ हा विहिरीमधील पाण्यात मयत अवस्थेत पाण्यावर तरंगत असतांना दिसला. यावेळी रोहिदास खेंगरे, आकाश कांबळे हे विहिरीत उतरले आणि इतर काही नागरिकांच्या मदतीने बाळू गुंजाळ याचा मृतदेह जाळ्याच्या सहाय्याने बाहेर काढला. यावेळी हवालदार संजय जाधव, रवी मेढे, सुनिल शिंदे, विनायक तनपूरे, राष्ट्रवादीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.