वेगवेगळे जाहीरनामे घेऊन मतदारांपुढे येणाऱ्या उमेदवारांची आता गर्दी सुरू होईल. पण, त्यांनी राजकारणाबरोबरच युवा पिढीसाठी नव्याने रोजगार कसा उपलब्ध करता येईल, याचाही विचार करावा. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष रोजगार निर्मितीवर भर द्यावा. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे उमेदवार कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा असू द्या, मात्र तरुणांच्या रोजगारावर ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा तरुणाईने व्यक्त केली आहे. शिवाय या निवडून आलेल्या उमेदवाराला जाब विचारण्यासाठी आपणही मतदान करून आपले कर्तव्य बजावणेदेखील महत्त्वाचे आहे, असेही तरुणांनी म्हटले आहे. याबाबत “प्रभात’ने साधलेला संवाद…
राजकीय घोषणा आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये बरीच तफावत दिसून येते. नेते, मंत्री विविध घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र त्यातील काहीच घडताना दिसत नाही. त्यामुळेच सरकारकडून जनतेची दिशाभूल होत आहे की काय, असे वाटत आहे. आज तरुणाईला अनेक समस्या आहेत. मात्र सर्वात बिकट परिस्थिती रोजगारासंदर्भात आहे. हजारो-लाखो रुपये खर्चून वर्षानुवर्षे अभ्यास करून डिग्री मिळवायची, पण त्या डिग्रीला कंपन्यांमध्ये कोणतीच किंमत नसते. हजारो तरुण आज बेरोजगार आहेत. त्यांच्या प्रश्नांबाबत काम करायला वेळ आहे का कोणाकडे? नेतेमंडळी राजकीय भाषणबाजीत व्यस्त आहेत आणि प्रश्न तसेच कायम आहेत. विकासाच्या गप्पा करून सत्तेत येणाऱ्यांकडून खरोखरच अपेक्षा होत्या, मात्र ती आशा आता धूसर होत आहे.
– शुभम भालेराव, महाविद्यालयीन विद्यार्थी
आतापर्यंत राजकारण हा विषय एका विशिष्ट घटकापुरता मर्यादित वाटायचा. अनेक नागरिक विशेषत: तरुणाई राजकारण या विषयाकडे दुर्लक्ष करत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत देशपातळीवर घडणाऱ्या घटना आणि निर्णयांमुळे अनेक नागरिकांचा राजकारणातील रस वाढत आहे. हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. सध्या तरुण, महिला अशा सर्वच स्तरातील व्यक्तींमध्ये राजकारण, निवडणूक याबाबत अधिक आवड निर्माण होत आहे. हे एका चांगल्या लोकशाहीचे प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाने राजकारण, निवडणूक, स्थानिक समस्या, आपले हक्क आणि जबाबदारी याबाबत जागरूक असले पाहिजे. त्यातूनच सक्षम लोकशाही आणि जबाबदार शासन निर्माण होते. तसेच देशाचा आणि पर्यायाने नागरिकांचा विकास होण्यामध्ये महत्त्वाचा हातभार लागेल.’
– प्रतीक देशमुख, महाविद्यालयीन विद्यार्थी
निवडून येण्यासाठी प्रत्येक पक्ष जोमाने प्रयत्न करतो. निवडणूक काळात नेते आणि कार्यकर्ते सातत्याने “कॅम्पेनिंग’ करतात. जाहीरनामे प्रसिद्ध करतात. प्रत्यक्षात मात्र त्या जाहीरनाम्यांची पूर्तता कधीच होत नाही. अनेकवेळा तर या जाहीरनाम्यांमध्ये मूळ प्रश्नच सामाविष्ट नसतात. नेतेमंडळींनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न जाणून घ्यावे. त्यानुसार जाहीरनामा बनवावा आणि त्याची पूर्ततादेखील करावी. त्याचबरोबर नागरिकांनीही आपण निवडून दिलेला नेता काम करतो की नाही याबाबत सातत्याने विचारणा करावी. लोकशाहीमध्ये नागरिक प्रश्न विचारू शकतात हीच त्याची विशिष्टता आहे. ती कायम राखण्यासाठी आपणही सजग असले पाहिजे. परंतु तुम्ही मतदानच केले नाही, तर कोणत्या अधिकाराने तुम्ही प्रश्न विचाराल? त्यासाठीच या निवडणुकीत आपण आवर्जून मतदान केले पाहिजे.’
– हिमांशू पंडित, महाविद्यालयीन विद्यार्थी
राजकारण म्हटले, की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक नागरिक तर मतदानही करत नाहीत. ही अतिशय खेदाची बाब आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुण्यातील नागरिकांचे मतदानाचे प्रमाण अतिशय कमी होते, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलावे असे वाटत आहे. कारण मतदान करणे हा आपला हक्कच नाही, तर कर्तव्यदेखील आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या या कर्तव्याची पूर्ती करावी. अनेक देशांमध्ये हा हक्क मिळावा, यासाठी लोक झगडत आहे. आपल्याला आपल्या संविधानाने हा हक्क दिला आहे, त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि लोकहिताची कामे करणाऱ्या पक्षाला निवडून दिले पाहिजे.’
– निखिल कारंडे, महाविद्यालयीन विद्यार्थी