राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांची टीका
मुंबई : भाजपचे माजी आमदार आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इतका लबाड आणि खोटारडा माणूस या जगाच्या पाठीवर सापडणार नसल्याची आरोप त्यांनी केला. फडणवीस हे कोणाशीच खरे बोलत नाहीत. यासाठी मी त्यांना पत्रही लिहिले होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिरपूर येथील एका सभेत अनिल गोटे यांनी ही टीका केली आहे. फडणवीस कोणाशीही खरे बोलत नाहीत. मी एकदा त्यांना पत्र लिहिले, देवेंद्रजी तुम्ही एक तरी दिवस खरे बोललेले सांगा. म्हणजे तो मला तो दिवस साजरा करता येईल. अमृता वहिनींना तरी ते खरे बोलतात का हे विचारावे लागेल. फडणवीसांनी धनगरांनाही फसवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
अनिल गोटे हे गत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि राज्यातील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाले होते. त्यामुळे गोटे यांनी आपला स्वतंत्र गट या निवडणुकीसाठी उतरवला होता. तसेच नंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थीही केली होती. परंतु, त्यानंतरही गोटेंनी आपला आक्रमकपणा कायम ठेवला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.