मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे पडणे आणि त्यामुळे येणाऱ्या गुंतागुंती किंवा नंतर होत जाणारं असाह्य आयुष्य जर टाळायचं असेल तर कोणत्या गोष्टी आपण करू शकतो ते पाहूया! त्यातील पहिल्या नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. असं लक्षात आलं आहे की, पन्नाशीनंतर जी मंडळी नियमाने चालतात अशा मंडळींमध्ये पडण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असते.
चालण्यामुळे फक्त कमरेच्या स्नायूंच्या आणि कमरेच्या व मांड्यांच्या, पायांच्या स्नायूंमध्ये ताकद येते असं नाही. तर सतत चालल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो आणि त्यामुळेच एकूण आरोग्य चांगलं राहतं. त्याचबरोबर चालणाऱ्या व्यक्तींची मानसिकता जास्त उत्साही असते. हळूहळू का होईना पण पायऱ्या चालण्याची सवय ठेवणे हा अत्यंत उत्तम व्यायाम समजला पाहिजे.
त्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे डोळ्यांचे आरोग्य राखणे. वर आपण बघितल्यानुसार ज्या मंडळींची दृष्टी कमी झालेली असते. अशा मंडळींमध्ये पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे चांगल्या नेत्र रोगतज्ज्ञांना दाखवून नजर सुधारून घेणे किंवा कॅटेरेक्सचे ऑपरेशन वेळेवर करणे. कारण काही मंडळी कॅटेरेक्सचे ऑपरेशन विनाकारण ढकलतात किंवा एकाच डोळ्याचं ऑपरेशन करून भागवतात. तसं न करता दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन योग्य वेळात करून घेणं आवश्यक ठरतं.
आपला चश्मा हा वर सांगितल्याप्रमाणे बायफोकल जर असेल तर लांबच बघण्यासाठी वेगळा चश्मा आणि वाचण्यासाठी फक्त वेगळा चश्मा वापरणं इष्ट ठरतं. असं लक्षात आलेलं आहे की पडणाऱ्या मंडळींमध्ये जवळपास 26 टक्के मंडळी ही केवळ दृष्टीहीन झाल्यामुळे पडतात. त्यामुळे नैसर्गिकतः आपण दृष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला तर पडण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकते. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे हृदय आणि डायबेटीस कंट्रोल मध्ये ठेवणं.
हृदयविकारामध्ये असे लक्षात आले आहे की, ज्या मंडळींना छातीमध्ये धडधडणे किंवा हृदयाचा वेग कमी जास्त होणे असे दिसते, अशा मंडळींमध्ये पडण्याचे प्रमाण जास्त असते. बऱ्याचदा हृदयरोग तज्ज्ञ काही लोकांना पेसमेकर बसून घ्यायला सांगतात. हृदयविकार असणाऱ्या लोकांना ज्यांना पेसमेकर बसवायला सांगितला आहे त्यांनी पेसमेकर बसवणे टाळू नये. कारण पेसमेकर बसवल्यामुळे जवळपास 30 टक्के हृदयविकाराच्या लोकांचे पडणे कमी होते, असे आढळून आले आहे. वर सांगितल्याप्रमाणे काही ब्लडप्रेशरच्या औषधांमुळे पडण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे आपल्याला हृदयरोग तज्ज्ञांना दाखवून अशी औषधे सुरू ठेवणे इष्ट असते.
ज्या मंडळींना चक्कर येण्याचा त्रास होतो, अशांना चक्कर येऊ नये म्हणून काही औषधे दिली जातात. या औषधांचे समायोजन डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित ठेवणे अत्यावश्यक असते. कारण चक्कर येण्याच्या वेळी जर तोल गेला, तर पडण्याचा धोका राहतो आणि अर्थातच पुढची गुंतागुंत होते. जी मंडळी अँटी-सायकोटिक म्हणजे तीव्र मानसिक आजारांकरता औषधे घेत असतात, अशा मंडळींची औषधे मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने हळूहळू कमी करून पडणार नाहीत अशा पद्धतीने ऍडजेस्ट करावी लागतात आणि त्यासाठी त्यांचा सल्ला घेत राहणे योग्य ठरते.
त्या पुढची गोष्ट आहे ती पायांचे आरोग्य आणि पादत्राणे नीट ठेवणे. पायांच्या आरोग्यामध्ये पायांच्या संवेदना जर कमी झाला असतील तर; त्या संवेदना सुधारण्यासाठीसुद्धा काही औषधे उपलब्ध आहेत, ते लवकर करून घ्यावे. केवळ मुंग्याच येत आहेत, पाय आजकाल बधीरच वाटताय, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, ते पुढे महागात पडते. पादत्राण्यांच्या बाबतीत बोललं तर फॅशनेबल पादत्राणे घालण्यापेक्षा ती पायाला व्यवस्थित बसतील अशा पद्धतीची आणि ज्यांचा सोल अत्यंत उत्तम ग्रीप घेणारा किंवा जमिनीला पकडून ठेवणारा असेल; अशी पादत्राणे वापरणाऱ्या लोकांचे पडण्याचे प्रमाण कमी राहते. उत्तम पादत्राणांची निवड हा खरे तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनचा विषय ठरवा इतका महत्त्वाचा आहे.
घरामध्ये जर वृद्ध मंडळी असतील, 65 वयाच्या वरची असतील, तर अशा मंडळींमध्ये घरात काही बदल करणे आवश्यक ठरते. घरामध्ये अनावश्यक फर्निचर असेल ज्याच्यामुळे चालताना अडथळा येईल, असे असेल तर ते फर्निचर कमी करणे आवश्यक आहे. टोकदार वस्तू, टेबलांचे कठडे, काचेची भांडी इकडे तिकडे पडतील, अशा पद्धतीने ठेवणे टाळावे. अनावश्यक फर्निचर कमी करून जर चालण्यासाठी जागा व्यवस्थित ठेवली तर पडण्याचे प्रमाण कमी होते.
विशेषतः घरातल्या बाथरूममध्ये लक्ष द्यावे लागते. बाथरूमची फरशी ही अँटीस्कीड किंवा पडण्यास प्रतिबंध करणारी असेल तर उत्तम. जेथे कमोड ठेवला आहे किंवा टॉयलेटचे भांडे असेल तेथे व्यवस्थित उभे राहण्याकरता, तोल सांभाळण्याकरिता, पकडून बसण्याकरता रॉड्स बसवून घेणे इष्ट आहे.
सध्या घरात गुळगुळीत फरशी बसवण्याची परंपरा/फॅशन मोठ्या प्रमाणात आहे. जिथे वृद्ध मंडळी असतील तेथे हा मोह टाळलेला बरा!कारण ते नजरेत कितीही सुखावह दिसले, तरी वृद्ध मंडळी त्यावरून हमखास घसरून पडू शकतात. सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे म्हणजे मानसिक आनंद ठेवणे. आपण वर पाहिलेच आहे की, जी मंडळी एकटी आहेत त्या मंडळींमध्ये पडण्याचे प्रमाण जास्त आहे. याचाच अर्थ असा की, घरामध्ये असणाऱ्या मंडळींनी वृद्ध असणाऱ्या मंडळींबरोबर जेवढा जास्तीत जास्त वेळ घालवता येईल तेवढा घालवावा. कारण त्यांच्याशी वारंवार बोलून त्यांचे मन आनंदी ठेवून त्यांचा मेंदू ताजेतवाना ठेवला तर त्या मेंदूची क्षमता चांगली राहते आणि तोल जाऊन पडण्यास प्रतिबंध होतो. आपण हे लक्षात ठेवायला हवे की, शेवटी त्यांच्या पडण्यामुळे त्यांचेच नुकसान होते असे नाही, तर पूर्णच्या पूर्ण घरच त्या व्यक्तीमुळे आजारी पडण्याचा संभव असतो.