पुणे – पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर राज्य सरकारने लवकरात लवकर पद भरतीची घोषणा केली. मात्र कोविडमुळे आणि परीक्षा लांबणीमुळे अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अपयशानं गाठलं आहे. अनेक मुलांना माघार घ्यावी लागली तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक मुलींना अभ्यासाला सोडत लग्न करावे लागले. यातील अनेकांना नैराश्य आले, मात्र यातच हिंमत न हारता कोल्हापूरातील एका तरुणानं स्पर्धा परीक्षा सोडून इतर क्षेत्रात चांगला पैसा आणि यश मिळवता येतं हे आपल्या चिकाटीतून करून दाखवलं.
याबाबत स्थानिक वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार,’शेखर भगवंत लोंढे या तरुणाचे नाव असून हा कोल्हापूरातील सांगरूळनजीक असणाऱ्या करवीर येथील रहिवासी आहे. त्याने आपले एमबीएचं शिक्षण पूर्ण करून ४ वर्षांपूर्वी ‘यूपीएससी’ची तयारी करण्यासाठी पुणे गाठलं. या काळात त्याने विविध परीक्षा दिल्या; पण एक दोन मार्कांनी त्याला यशानं नेहमी हुलकावणी दिली. या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवल्यानं तो गावी गेला आणि स्पर्धा परीक्षेला कायमचा पूर्णविराम दिला.
गावाकडे जाऊन त्याने बंद पडलेली राईस मील पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या राईस मीलमध्ये शेखर कर्नाटकावरून भात आणतो. त्या भाताचं ग्रेडिंग, पॉलिश, फिनिशिंग ची प्रक्रिया मीलमध्ये करतो. सध्या शेखर ८०० टन पेक्षा जास्त भातावर प्रक्रिया करत असतो. त्याने याच दरम्यान ‘मदर गोल्ड’ नावाचा भाताचा ब्रॅंन्ड त्यानं बाजारात आणला आहे. शेखर दरमहा 1 कोटी रुपयांची उलाढाल करतो. सध्या गावकऱ्याकडून त्याच्या उत्तुंग यशाचं केले जात आहे .