मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सूचना
पुणे – अनेक कर्मचारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात येऊन आपली अपूर्ण कामे करत असतात, त्याबाबत अनेकवेळा विभागप्रमुखांनाही कल्पना नसते. मात्र, यापुढे कार्यालयात यायचे असेल तर संबधित विभागप्रमुखांची परवानगी घेणे संबंधीत कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे, याबाबतची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागप्रमुखांना दिली आहे. त्यामुळे आता “काम नाही झाले तरी, होईल सुट्टीच्या दिवशी’ असे करता येणार नाही.
जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन अपूर्ण कामे करत असतात. आत्तापर्यंत कर्मचारी स्वतःच ठरवून कार्यालयात सुट्टीच्या दिवशी कामावर उपस्थित राहत होते. या दिवशी काही महत्त्वाच्या कामांचा निपटारा कर्मचाऱ्यांकडून केला जातो.
परंतु, आता असे यापुढे कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. त्यासाठी आता पहिल्यांदा विभागप्रमुखांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर विभागप्रमुखाला ही बाब सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूण देणे बंधनकारक असेल. जिल्हा परिषदेसह पंचायत समितींना देखील अशाच प्रकारे अंमलबजावणी केली जाणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये जानेवारीत पंचसुत्री कार्यक्रम राबविण्यात आला, त्या काळात प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कामावर उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, गत आठवड्यातील विभागप्रमुखांच्या बैठकीमध्ये पंचसुत्रीच्या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.