ब्रिस्बेन – अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत सरस कामगिरी करत यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र, संघाच्या पराभवावर विश्वास बसत नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
विजयासाठी आवश्यक 328 धावांचे लक्ष्य गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये तीन गडी राखून विजय नोंदवला. भारतीय संघात नवोदित खेळाडूंची संख्या जास्त असूनही त्यांनी अफलातून कामगिरी केली. मात्र, यजमान संघालाही वर्चस्व राखण्याची संधी होती ती त्यांनी गमावली. त्यामुळेच ही मालिका गमवावी लागली. असे असले तरीही हा पराभव अद्याप पचनी पडलेला नाही, असेही पॉंटिंग म्हणाला.
प्रमुख खेळाडूंसह संपूर्ण मालिका खेळूनही ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. त्यावर अद्याप विश्वासच बसत नाही. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचा संघ प्रमुख संघ नव्हता तर अ संघाइतकीच त्यांची ओळख होती. तरीही त्यांना मालिका जिंकली. त्यामुळे भारतीय संघाचं कौतुक करावे तितके कमीच आहे. एकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जात त्यांनी ही मालिका जिंकली. गेल्या पाच-सहा आठवड्यात भारतीय संघ कठीण प्रसंगातून गेला आहे. कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. त्यातच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे भारताला नवख्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरावे लागले. ऑस्ट्रेलिया तर आपल्या संपूर्ण ताकदीने उतरला होता. तरीही पराभवाला सामोरे जावे लागले हेच माझ्यासाठी धक्कादायक आहे, असेही त्याने सांगितले.
पीटरसनचा माइंड गेम
ऑस्ट्रेलियात केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर देशात एखाद्या सोहळ्यासारखे वातावरण आहे. मात्र, त्यातच केवीन पीटरसननेही माइंड गेम सुरू केला असून फार आनंदी होऊ नका आमचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे, असे सांगून पीटरसनने भारतीय संघाची पुन्हा एकदा कळ काढली आहे.
जीत का जश्न जरूर मनाएं, लेकिन हमसे सावधान रहे, असे ट्विट त्याने चक्क हिंदीतून केले असून त्यातूनच भारतीय संघाला इशारा दिला आहे.