नवी दिल्ली – देशात करोनाचा थैमान थांबायच नाव घेत नाही. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्स देखील कमी पडत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे.
देशातील सध्याची स्थिती पाहून तुम्ही आंधळे होऊ शकता, पण आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. पण आम्ही तस करू शकत नाही, असा शब्दांत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
उच्च न्यायालयात अमिकस क्यूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अनेक लोकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागत आहे. काही जागांवर ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. जेणेकरुन ऐनवेळी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असा सल्लाही अमिकस क्यूरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला दिला आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनची गरज भागत असेल तर महाराष्ट्रातील काही टँकर दिल्लीला पाठवले जाऊ शकतात, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय
राजधानी दिल्लीत सध्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक रुग्णांना ऑक्सिजन मिळणं कठीण झालं आहे. रविवारी दिल्लीला 440 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, दिल्लीचा कोटा हा 590 टन इतका आहे. इतकच नाही तर सध्या दिल्लीतील ऑक्सिजनची मागणी आता 976 मेट्रिक टन इतकी बनली असल्याचंही सिसोदिया म्हणाले.