मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. शिवसेना सामानाच्या अग्रलेखातून भाजपवर सतत टीका होताना दिसते. त्यातील भाषेवर आता भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा.
संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असे म्हटले होते तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
“सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.
“ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती असे ते म्हणाले होते. चांगलं आहे, मग बाळासाबेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
“नवीन वर्षात अध्यक्ष म्हणून खूप प्रवास करुन संघटन मजबूत करण्याचा माझा संकल्प आहे. १४ हजार ग्रांमपंचायत निवडणुका १५ जानेवारीला आहेत. त्या अधिकाधिक जिंकाव्यात यासाठी प्रयत्न आहे. याशिवाय २०२२ साली मुंबईसह पालिका निवडणुका लढवणे, जिंकणे हादेखील संकल्प आहे. तसंच त्यातही मुंबईवर दिल्लीचंही लक्ष राहील. मुंबईच्या पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणं आणि पैसे गोळा करणं एवढंच लक्ष राहिलं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.