जयेश राणे
आपण शिक्षणाने प्रगत झालो; पण कसे वागायचे, बोलायचे याचे काही भानच राहिलेले नाही. नीतिमत्ता, नैतिकता राहिलेलीच नाही. राहिला आहे तो केवळ भोगवाद. यातूनच अत्याचार आणि आयुष्ये उद्ध्वस्त करणाऱ्या घटना घडताहेत.
आजमितीस युवक आणि युवती यांतील मैत्री अनेक मर्यादा ओलांडून गेली आहे. एकमेकांशी बोलताना एकमेकांना मारणे (स्पर्श करण्याचा बहाणा), बाइकवर बसताना अयोग्य प्रकारे बसणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करणे, रिक्षा-टॅक्सी यांतून जातानाही त्याच गोष्टी करणे म्हणजे शरीराचा स्पर्श कसा होत राहील याकडेच सतत लक्ष ठेवले जाते. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बदलत राहणे, यांच्यात ब्रेकअप होणे या गोष्टी तर अत्यंत कॉमन (सर्वसामान्य) समजल्या जात आहेत. मित्र-मैत्रीण म्हणून मैत्री का होते? हा विचार करायला आवड-सवडही नाही, अशी स्थिती आहे. अर्थातच सर्वचजण असे नसले तरी बहुतांशजण याच वर्गवारीत मोडत आहेत, हे वास्तव नाकारता येत नाही. शिक्षणातून केवळ आणि केवळ नोकरी-व्यवसाय यांसाठी आवश्यक ज्ञान घेत आहोत. बाकी जीवनात तर सावळागोंधळच चालू आहे.
परिचयातील एका व्यक्तीने ती जपान येथे गेल्यावर त्याने अनुभवलेली एक गोष्ट सांगितली. “तिथे इयत्ता पहिली ते चौथी अन्य अभ्यासक्रमांसह सार्वजनिक ठिकाणी, वैयक्तिक जीवनात, मित्र-मैत्रिणी, वडीलधारी माणसे आदी सर्वांसह कसे वागावे, बोलावे याचे शिक्षणाच्या माध्यमातून एक प्रकारे प्रशिक्षणच दिले जाते.’ यामुळे बालपणापासूनच त्यांच्या मनावर योग्य ते संस्कार बिंबवले जाण्यास साहाय्य होते. आपण कुठे, कोणत्या, चुकीच्या मार्गाने किंवा विचारांमागे वाहत तर जात नाही ना? आपला संयम तर कुठे ढळत नाही ना? आपण योग्य प्रकारे वागत आहोत ना? असे प्रश्न पडल्यावर व्यक्तीला अयोग्य कृती करण्यापासून परावृत्त करतात. मग तो युवक असो अथवा युवती.
पिकनिक, बर्थडे पार्टी इत्यादी कारणे सांगून युवक-युवती घराबाहेर पडतात. अशा ठिकाणी अनेक युवतींची शारीरिकदृष्ट्या फसवणूक होते. त्यांना पेय, जेवण यांतून गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केला जातो. अशा गोष्टीला समाज काय म्हणेल? या लाजेपोटी उघड होण्याचे प्रमाण नगण्यच आहे, असे म्हणावे लागेल. अशा गोष्टी घडत आहेत. त्यावरून हे तरी लक्षात येत आहे की, कोणत्या निमित्ताने एकत्र आले जात आहे आणि त्या ठिकाणी काय होत असण्याची शक्यता आहे?
कितीही चांगला मित्र असला तरी ती मैत्री शाळा-महाविद्यालय स्तरावर अभ्यासापर्यंत ठीक आहे; पण त्यापलीकडे जाऊन अनावश्यक जवळीक निर्माण करण्याचा आटापिटा समोरून होत असेल, तर वेळीच शहाणे होणे हिताचे असते. याविषयी एक अलीकडचाच प्रसंग पाहूया. घनसावंगी (जिल्हा औरंगाबाद) तालुक्यातील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय तरुणीचे भाऊ, भावजय मुंबईतील चेंबूर परिसरात राहतात. दोन महिन्यांपूर्वी पीडिता ही भावाच्या घरी गेली होती. तेव्हापासून ती तेथेच राहात होती. 7 जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडली. नंतर तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केले.
सायंकाळी सहाच्या सुमारास ती घरी परतली आणि झोपली. तेव्हापासून ती आजारी पडली. तिचे दोन्ही पाय लटलट कापतात, तिला पॅरॉलिसिस झाला असावा, असे सांगून भावाने गावाकडील वडिलांना फोन करून बोलावून घेतले. नंतर गावी उपचार करू, असे म्हणून 17 जुलै रोजी ते तिला मुंबईहून गावी घेऊन गेले. औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावरील उपचाराची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली तेव्हा तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिच्या आई-बाबांना सांगितले. यानंतर तिच्या आई-बाबांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मात्र, कोणी अत्याचार केले हे तिला सांगता आले नाही.
शिवाय तिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनीही तिच्याकडे अधिक विचारपूस केली नाही. याविषयी पीडितेच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. घटना मुंबईच्या चेंबूर परिसरातील असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी (मुंबई) पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. अत्याचार झाल्यापासून पीडिता आजारी पडली. तिला पायावर उभे राहता येत नाही. शिवाय अशक्तपणा आल्याने तिचे संपूर्ण अंग थरथर कापत आहे. तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले. एकंदरित प्रकरण किती गंभीर आहे हे यावरून लक्षात आले असेलच. युवतीची अवस्था मरणासन्न झाली आहे. या जगात काय काय चालू आहे? याकडे विचारपूर्वक लक्षवेध होऊन शहाणपण अंगी बाणवण्यातच समजूतदारपणा आहे.