थकल्यासारखं वाटतंय. डोकं पण जड झालंय. जराशी उसंत घेऊ का?’ स्वतःच्याच मनाशी पुटपुटत भक्तीने हातातलं पुस्तक खाली ठेवलं. आरामखुर्चीत बसल्या बसल्या तिने डोळे मिटून घेतले. पापण्यांचं पांघरूण घेत डोळे तर बंद केले; पण मन मात्र सताड जागंच होतं. अंधारात शोध घेत फिरत होतं. शोध; पण कशाचा? ते काही उमगत नव्हतं. त्याच्यापुढं शेवटी हतबल होऊन भक्ती उठली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीच्या गजांना धरलेली हाताची बोटं तिच्या गुणगुणणाऱ्या ओठांची साथ देत होते. “तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे…’ गाणं म्हणता म्हणता ती मध्येच थांबली आणि समोर दिसणाऱ्या समुद्राकडं पाहत विचारलं. “तू का अजून जागा आहेस? अरे हो, विसरलेच की. ही रात्र तुझीच, नाही का! तुझ्या अथांग देहातून उसळणाऱ्या लाटा बघतानाच कळतंय, किती अधीर झालास तू तिला भेटायला! तुझ्याकडं पाहिलं की मला नेहमीच एक प्रश्न पडतो. कळतच नाही की, ते आभाळ तुला टेकलंय का तूच त्याला क्षितिजापाशी तुझ्या कवेत घेतलंस?
कधीकधी मला तुझा हेवा पण वाटतो. धरतीच्या कुशीत तुला असं हिंदोळे घेताना पाहून! किती खोलवर रुजलीत तुमच्यातल्या नात्यांची पाळेमुळे! म्हणजे बघ ना, वसुधेच्या उदरातून जन्म घेऊन तू खरंच समृद्ध झालास. अगदी तुझ्या नावासारखाच “रत्नाकर’. आणि तेवढंच विशाल हृदय तुझं. देवापुढे हात पसरून आम्ही सतत काही ना काही मागत असतो. आणि तू मात्र तुझ्या दोन्ही हातांनी भरभरून दिलंस रे त्याच देवदेवतांना! तुझी घुसळण होताना आतले हिरे, मोती एवढंच काय तुझ्या पोटात दडलेलं अमृत सुद्धा देऊन टाकलंस! होतं नव्हतं तेवढं सगळं देऊन स्वतः मात्र रिक्त झालास; पण तुझ्या चेहऱ्यावर शिकस्त ती कसलीच नाही!
तुझं रूप तेवढंच मोहक वाटतं. उगवत्या सूर्याच्या किरणांनी तुझी सोनेरी झालेली काया आणि तिन्हीसांजेला त्याच सूर्याने तुझ्यात डुबकी घेताना तुझ्यावर केलेली तांबड्या रंगाची उधळण पाहून असं वाटतं, जणू हा भास्कर तुझ्याचसाठी सप्तरंग प्यायला आहे! कधी तुझं रौद्र रूप पाहून शरीराचा आणि मनाचा थरकाप उडतो. पौर्णिमेच्या रात्री तुझा उन्माद पाहून काळजात धस्स करतं. त्यातच तो सोसाट्याचा वारा तुझ्यावरून वाहताना तुझ्या लाटांनी घेतलेल्या उसळ्या पाहून, तुमच्या दोघात काही वैर तर नसेल ना? या विचारानं मनात थैमान माजतं. तुमच्यातलं द्वंद्व पाहताना तो चंद्र मात्र मनोमन सुखावतो. आणि मग समजतं की खरं वैर तर तुम्हा दोघांचं. तो वारा तर तुला फक्त भरकटवत होता. तुझ्या रात्रीपासून तुला दूर करत होता! कारण चंद्राला एकांत जो हवा होता; त्याच रात्रीसोबत!
दिवसांमागून दिवस निघून जातात. तू उद्विग्न होऊन शांत पडून राहतोस; त्या काळ्याकुट्ट अमावस्येच्या अंधारात. तुझ्या लाटा खडकावर आदळताना पाहून वाटतं, जणू त्याने पण तुला जेरबंद केलंय. एरवी त्यावरून उसळी घेऊन त्याला चारी मुंड्या चीत करताना पाहिलंय मी तुला. तू असा किनाऱ्यावर दबक्या पावलानं येताना पहिल्यांदाच पाहतेय. काहीतरी हितगुज करतोस त्या किनाऱ्याशी आणि पुन्हा आल्या पावलांनी परत जातोस.
त्यादिवशी मी तिथेच होते. तुझ्या किनारी. वाटलं होतं नेहमीसारखा स्पर्शून जाशील मला. नाहीतर मुद्दाम खोडीलपणे रेतीत कोरलेलं माझ्या अर्णवचं नाव पुसून काढशील. तुला परत जाताना पाहून तुझ्या मागे पण आले होते मी. तुला माझ्या हाताच्या ओंजळीत घ्यायला गेले; पण तू निसटलास आणि सर्कन निघून गेलास. बराच वेळ मी तशीच उभी होते. तुझी वाट पाहत. तुझ्या किनाऱ्यावर. तू परत आलाच नाहीस. तुझं दुःख कळलंय मला. ज्या “रात्री’ ला तू तुझ्या मिठीत घेऊ पाहत होतास, तिने कधीच त्या चंद्राला आपल्या बाहुपाशात घेतलं होतं. तू मात्र तसाच गलितगात्र राहिलास. स्वतःच्या आसवांना पिऊन टाकत तू पुन्हा एकदा रिक्त झालास!
माझं दुःख तरी कुठं तुझ्यापेक्षा वेगळं आहे! नियतीने काळाचा घाला घालत माझ्या अर्णवला पण असंच आपल्या जाळ्यात ओढून दूर नेलंय. मी पण रिक्त झालीय. तुझ्यासारखीच. एकटेपण खायला उठतं. तुला आज काहीतरी मागणार आहे. तुझ्या किनाऱ्यावर उभी असले ना की, त्या तिथे दूर क्षितिजापलीकडे मला माझा अर्णव दिसतो. मला बोलावत असल्याचा भास होतो. एकदा घेऊन जाशील मला तिथे? पुन्हा कधीच न परतण्यासाठी. मी तुझ्या स्वाधीन होईल; पण मला एक वचन दे. माझं “रितेपण’ तू “कायमचं’ नाहीसं करशील!
अमोल भालेराव