लखनौ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे प्रथम अयोध्या नंतर मथुरा किंवा प्रयागराज येथून निवडणूक लढवण्याची चर्चा होती. पण भाजपने त्यांना त्यांच्याच घरी म्हणजे गोरखपुरला पाठवले आहे. योगींनी आता तिथेच राहावे, तेथून परत येऊ नये असा टोमणा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांनी मारला आहे.
योगींनी जो 80-20 फॉम्युर्ला प्रस्तावित केला आहे त्याचा अर्थ 20 टक्के जागा भाजपला मिळतील आणि 80 टक्के जागा समाजवादी पार्टीला मिळतील असा आहे असेही त्यांनी उपरोधिकपणे नमूद केले आहे. गेले काही दिवस योगी आणि अखिलेश यांच्यात जोरदार वादंग सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एमकेकांना लक्ष्य करीत आहेत, पण त्यात अखिलेश यांनीच जोरदार टायमिंग साधत योगींवर कुरघोडी केल्याचे सध्या दिसत आहे.
चंद्रशेखर आझाद यांच्याशी झालेल्या मतभेदांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश यांनी सांगितले की पहिल्यांदा ते माझ्याकडे चर्चेला आले त्यावेळी मी निवडणूक लढवणार आहे असे त्यांनी म्हटले होते.
त्यानुसार मी लोकदलाशी चर्चा करून त्यांना गाझीयाबाद, रामपुर मनिहरन या जागा देऊ केल्या. नंतर त्यांना एक फोन आला आणि त्यांनी आता मी निवडणूक लढवणार नाही असे म्हटले आहे. हा फोन कोणाचा होता असा सवाल अखिलेश यांनी केला आहे. आपण पुरेशा पक्षांशी आता आघाडी केली असून आणखी नेत्यांना आम्ही वाव देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.