रामगड – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बिहारच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यांनी आज येथे प्रचारसभा घेताना विकासाभिमुख कारभार पाहणारे नितीशकुमार यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप सरकारने अयोध्या, काश्मीर आणि पाकिस्तान या विषयावर दिलेली आश्वासने पूर्ण केली असल्याचा दावा करीत त्या विषयावरही त्यांनी लोकांकडून मते मागितली आहेत.
राजद आणि कॉंग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचार आणि घराणेशाहीत अडकलेले पक्ष आहेत. त्यांना देशाच्या कल्याणापेक्षा आपल्या कुटुंबाचे कल्याण महत्त्वाचे वाटत आले आहे असा आरोपही त्यांनी केला.
त्यांची भूक इतकी प्रचंड आहे की खाण्यासाठी काहीही उरले नाही त्यावेळी त्यांनी जनावरांचा चाराही खाल्ला आहे असा टोमणाही त्यांनी राजदला मारला. राजदच्या निवडणूक पोस्टर्सवर लालू, राबडी, तेजस्वी आणि तेजप्रताप यांचेच फोटो आहेत. त्यांच्या पोस्टरवर सामान्य माणूस कधी दिसला नाही, असा आरोपही त्यांनी केला.