मुंबई – सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे. व्होट बँकेचा कचरा आता कोणालाच आपल्या अंगणात नको आहे.असं म्हणत सामनाचा अग्रलेखातून योगी सरकारचा शिवसेनेन खरपूस समाचार घेतला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख ?
उत्तर प्रदेश , बिहार, ओडिशा, आंध्र अशा राज्यांतला मजूरवर्ग देशात पसरलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातेत तो सर्वाधिक आहे. कालपर्यंत हा मजूरवर्ग म्हणजे अनेक राजकीय पक्ष व पुढार्यांची ‘व्होट बँक’ बनली होती व जणू मुंबई-महाराष्ट्र यांच्याच श्रमातून उभा राहिला अशी बतावणी सुरू होती. आता या मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करीत आहेत व त्यांचे राजकीय मालक-पालक तोंडात मास्कचे बोळे कोंबून घरातच बसले आहेत. या श्रमिकांना आता कोणीच वाली उरलेला दिसत नाही. आज या हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत. सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे. व्होट बँकेचा कचरा आता कोणालाच आपल्या अंगणात नको आहे.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत जो ‘यू टर्न’ घेतला आहे तो माणुसकीस धरून नाही. आपल्याच लोकांशी असे क्रूरपणे वागणे कोणालाच शोभत नाही. सोप्या मराठी भाषेत त्यास बगला वर करणे म्हणतात व उत्तर प्रदेश प्रशासनाने अशा बगला वर केल्याने 30-35 लाख हिंदी मजूरवर्गाच्या जीवाची तडफड सुरू आहे. कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे मुंबईसह राज्याच्या विविध भागांत मजूरवर्ग अडकून पडला, त्यांना आपल्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी आता केंद्र सरकारने दिली आहे. उत्तर प्रदेश-बिहारचे सर्वाधिक मजूर मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत राहतात. हा आकडा 25-30 लाखांच्या घरात असावा व या लाखो लोकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी झुंबड उडवली आहे. सुरत येथे तर उत्तर प्रदेशातील हजारो मजूर रस्त्यावर उतरले.