नवी दिल्ली – िंहंदू वारसा हक्कात सन 2005 मध्ये दुरुस्ती करून मुलींनाहीं वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तथापि ही दुरुस्ती होण्याच्या आधी जर वडिलांचे निधन झाले असेल तर त्या प्रकरणात मुलीला असा समान वाटा द्यावा काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
त्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला असून 2005 पूर्वीही जरी वडिलांचे निधन झाले असेल तरीही मुलीला संपत्तीच्या समान वाट्यातून वंचित ठेवता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालपत्रात स्पष्ट केले आहे.
अरुण मिश्रा, एस नझीर आणि एम. आर. शहा यां तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की मुलीचा जन्म 2005 च्या आधी किंवा नंतर झालेला असेल किंवा वडिलांचे निधन 2005 पूर्वी झालेले असेल तरीही मुलीला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. तिला वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळवण्याचा अधिकार अबाधितच राहतो.
या विषयीची अनेक प्रकरणे देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्याविषयी अनेक न्यायालयांनी परस्पर विरोधी निकाल दिले आहेत. त्यामुळे आजचा हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा आहे व त्या आधारावर बाकीच्या प्रकरणांमध्ये न्याय मागणे संबंधीतांना सोपे होणार आहे. याच आधारावर बाकीच्याही न्यायालयांनी येत्या सहा महिन्यांच्या आत या प्रकरणांचे निकाल द्यावेत असा आदेशहीं सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.