मुंबई – “कामाख्या देवीची यात्रा करून मुख्यमंत्री व त्यांच्या गटाचे आमदार परतले. जनावरांचे बळी देऊन नवस फेडण्यासाठी ते गेले होते हे आता जगजाहीर आहे. तो नवस काही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हता. फुटलेल्या चाळीस आमदारांची मर्जी सांभाळणे एवढेच काम मुख्यमंत्र्यांकडे दिसते. बाकी राज्यात नव्या ‘बाजीरावी’चेच चित्र दिसत आहे” असा टोला सामनाच्या रोखठोकमधून लगावण्यात आला आहे.
“देव सत्य, सर्वज्ञ आणि शक्तिमान आहे.’’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या गटाच्या आमदारांना याचा विसर पडलेला दिसतो. इंदिरा गांधी या सगळय़ात जास्त धार्मिक होत्या, तरीही ईश्वर त्यांचा पराभव रोखू शकला नाही. इथे तर चाळीस आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली व ते आशीर्वाद घ्यायला आसामच्या तीर्थस्थानी पोहोचले” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून केली आहे.
रोखठोकमधून उपस्थित केलेले सवाल
देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर मनापासून समाधानी आहेत काय?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील दोन जिल्हय़ांवर दावाच सांगितला. बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी सीमा भाग राहिला बाजूला, उलट आणखी दोन जिल्हेही आमचेच, असे बरळणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध जनता संतापली, पण राज्यकर्ते थंड आहेत.
पोपट आबाजी जाधव या शेतकऱ्याने नगर जिल्हय़ात आत्महत्या केली. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने त्यांची वीज तोडली. या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केली. अशा अनेक शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. कोणता देव या आत्महत्या थांबवणार !
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा सरळ अपमान केला. तरीही ते राज्यपालपदावर चिकटून आहेत. राज्यपालांचे काय करायचे? याबाबत सरकारने देवीला विचारणा केली काय?
महाराष्ट्रातून मोठे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवून नेले जात आहेत. लाखोंचा रोजगार त्यामुळे बुडाला व राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत हे त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊन निघून जातात, पण गुजरात पिंवा कर्नाटकने महाराष्ट्राच्या बाबतीत जो अन्याय चालवला आहे त्यावर स्वाभिमानी भूमिका घेण्याची हिंमत आज एकाही मंत्र्यात दिसत नाही. सरकार इतके बुळचट का झाले आहे?
“मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत आहेत. श्री. फडणवीस यांनाही ते मानायला तयार नाहीत. कारण शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले, पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले?” असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून उपस्थित करण्यात आला आहे.