राहुल गोखले
लहान मुलगा पानांवरील दवबिंदूंना पाहून कुतुहलाने जे म्हणतो तेच बहुधा कार्यकर्ते, समर्थक आणि मतदार ऐन निवडणुकीच्या काळात आलेल्या आणि पक्षाची उमेदवारी अचानक मिळालेल्यांना उद्देशून म्हणतील- कोठून हे आले येथे? काल संध्याकाळी नव्हते’. पक्ष नेतृत्व त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकतील का, हा खरा सवाल आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू असतानाच पक्षांतरांना देखील जोम चढला आहे; एवढेच नव्हे तर कोणकोणत्या जागेवरून निवडणूक लढवील याचाही नेम राहिलेला नाही. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही काळात अन्य पक्षांतून इतक्या जणांना पक्षात प्रवेश दिला की दीर्घकाळ भाजपमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या हाती काय लागणार हा प्रश्न निर्माण होणार होताच. तसे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपमध्ये नाराजीचे सूर प्रकट होऊ लागले आहेत. शिवाय बंडखोरीचे संकेतदेखील मिळू लागले आहेत. अन्य पक्षांतून बंडखोरांना आपल्या पक्षात घेताना जी “जितं मया’ची भावना होती तीच आता भाजपला वाकुल्या दाखविते आहे, म्हटले पाहिजे. शिवसेनेत देखील निराळे चित्र नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भरतीला भाजपने मेगाभरती असे संबोधिले होते. आता पक्षात अस्वस्थता आणि नाराजी देखील “मेगा’ स्वरूपात आहे हे निश्चित. विरोधकांना खिळखिळे करण्याच्या जोशात भाजप स्वतःच्या पारंपरिक मतदारांना नाराज करीत असल्याचे भान भाजप नेतृत्वाला राहिलेले नसावे. मात्र अशा गफलतींचे परिणाम दूरगामी असतात याची जाणीव ठेवावयास हवी.
अशाच आयाराम गयाराम संस्कृतीचे परिणाम कॉंग्रेसने भोगले आहेत. त्या पक्षाचा राजकीय भरभराटीचा काळ होता तेव्हा कॉंग्रेसमध्ये जाण्यास सर्वच उत्सुक असत. किंबहुना ज्या आमदाराच्या नावावरून आयाराम-गयाराम ही संज्ञा भारतीय राजकारणात अशा बिनदिक्कत आणि विधिनिषेधशून्य पक्षांतरांसाठी वापरली जाऊ लागली ते गया लाल यांनी पंधरा दिवसांत तीनदा पक्षांतर केले होते. अर्थात, तेव्हा पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात नव्हता. परंतु आताचे पक्षबदलू हे त्या गया लाल यांच्यापेक्षा तसूभर कमी नाहीत हेही तितकेच खरे. 1967च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला स्वातंत्र्यापासून सर्वांत कमी जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेश, बिहार यासह अनेक राज्यांत कॉंग्रेसची विधानसभा निवडणुकांत पीछेहाट झाली होती.
हरियाणा राज्य अस्तित्वात आल्यानंतरची त्या राज्याची ती पहिलीच विधानसभा निवडणूक होती आणि कॉंग्रेसला 80 पैकी 48 जागा मिळाल्या होत्या म्हणजेच काठावरील बहुमत कॉंग्रेसला मिळाले होते. जनसंघाला 12 जागांवर विजय तर अपक्ष 16 जागांवर निवडून आले होते. याच अपेक्षांमध्ये हसनपूर मतदारसंघातून निवडून आलेले गया लाल होते. भागवत दयाळ शर्मा मुख्यमंत्री झाले खरे; मात्र लवकरच बारा कॉंग्रेस आमदारांनी कॉंग्रेसमधून फुटून हरियाणा कॉंग्रेस नावाचा गट बनविला आणि अपक्षांनी संयुक्त आघाडी नावाचा पक्ष बनविला. पक्षांतरे सुरूच राहिली आणि संयुक्त आघाडीची संख्या तब्बल 48 पर्यंत पोहोचली. याच बॅनरखाली राव बिरेंद्र सिंग मुख्यमंत्री झाले. तथापि शर्मा आणि देवीलाल यांच्याकडून सिंग यांना आव्हान कायम होते.
या सगळ्या अनिश्चिततेत कोणी भर टाकली असेल तर ती गया लाल यांनी. त्यांनी अवघ्या नऊ तासांत दोन वेळा बाजू बदलल्या- कॉंग्रेसच्या आत बाहेर केले आणि त्यानंतर पंधरवड्याच्या आत संयुक्त आघाडीत समाविष्ट झाले. राव बिरेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत गया लाल यांना सादर केले आणि उद्गार काढले- गया राम आता आया राम आहेत. राव सरकार अल्पकाळ टिकले तरीही गया लाल यांची पक्षांतराची घोडदौड सुरूच राहिली. आर्य समाज, नंतर लोकदल, मग जनता पक्ष अशी त्यांची वाटचाल राहिली. 1982 मध्ये त्यांनी शेवटची निवडणूक लढविली ती अपक्ष म्हणून. गया लाल यांनी विधिनिषेधशून्य पक्षांतर करण्याचे जणू प्रमाण निर्माण केले. महाराष्ट्रात आता जी पक्षांतरे होत आहेत ती गया लाल यांच्यासारखी आकडेवारीत नसली तरीही सत्तालालसेच्या बाबतीत ती गया लाल यांच्यापेक्षा थोडीही कमी नाहीत.
महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक आयारामांना पक्षात प्रवेश दिला असेच म्हटले पाहिजे आणि त्याचा त्यांना अभिमान वाटत होता आणि अद्यापि असावा. विरोधी पक्ष कमकुवत करून भाजपचा विस्तार करण्याचे धोरण भाजपने आखले असावे असे हे पक्षप्रवेश होत होते. मात्र याचे धोकेही असतात आणि ते भाजपला आता धक्के देऊ शकतात. पक्षाला जेव्हा लोकमान्यता नव्हती तेव्हापासून पक्षाची सेवा निरलसपणे करणाऱ्यांना उमेदवारी न मिळता ती बाहेरून आलेल्यांना आणि केवळ जिंकून येण्याची क्षमता एवढाच निकष असलेल्यांना मिळू लागली की पक्षात अस्वस्थता पसरते असे नाही तर एक प्रकारची उदासीनता येते.
कार्यकर्त्यांमध्ये केवळ नाराजी पसरते असे नाही तर आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना अधिक प्रबळ होते. ही भावना वाढीस लागली की पक्ष पोखरण्यास सुरुवात झाली आहे असे समजण्यास हरकत नाही. कॉंग्रेसमध्ये एके काळी अशीच खोगीरभरती सुरू असे. त्याचा परिणाम कॉंग्रेस संघटन दुर्बल होण्यात झाला आणि दरबारी राजकारण वाढीस लागले. याचे परिणाम शेवटच्या स्तरावर दिसण्यास वेळ लागतो कारण नेते कसेही वागले तरीही कार्यकर्ते पक्ष आणि संघटनेसाठी लढत असतात. पण नेतृत्वाच्या गफलतींचे परिणाम कधीतरी खाली झिरपतातच आणि मग कॉंग्रेसची आताची जी स्थिती आहे तशी निर्माण होते.
भाजपला आज सर्वत्र सत्ता मिळत आहे आणि त्यामुळे सर्वपक्षीयांनी भाजपमध्ये यायचे आहे. पण हा पक्षप्रवेश भाजपच्या धोरणांच्या किंवा तत्त्वज्ञानाच्या प्रेमापोटी नाही हे कळावयास फारशा बुद्धीची गरज नाही. सोयीस्करपणातून ही पक्षांतरे होत आहेत आणि हा सोयीस्करपणा आयारामांचा आहे तद्वतच भाजपचा देखील आहे. तथापि सोयीस्करपणातून हळूहळू सवय जडते आणि सवयीचा अतिरेक झाला की त्यातून कोडगेपणादेखील निर्माण होतो. पक्ष आणि संघटनेला धोका असतो तो या कोडगेपणाचा कारण तोच अखेर घात करतो. पक्ष कोणताही असो, या संस्कृतीचा दीर्घकालीन धोका त्यांनी ओळखला पाहिजे.