मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र त्याच्या या टीकेला आता विरोधकांनाही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे.’काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता’, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. नितेश राणे म्हणाले की, स्वतःच्या मुलाचे कर्तृत्व लपवण्यासाठी हे चाललं आहे. हे म्हणजे महाराष्ट्र आणि आम्ही बाहेरून आलोय का? पोलिसांबद्दल आम्हाला पण आदर आहे. यांनी आम्हाला शिकवू नये, असंही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की, बाळासाहेबांनी अंगणात तुळशी वृंदावनच लावले होते. पण यांचा श्रावणबाळ जिथे संध्याकाळी बसतो त्या डिनोच्या अंगणात तुळशी होती की गांज्याची शेती आहे ते तपासून पहा, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, सीबीआयला निःपक्षपातीने चौकशी का करू दिले जात नाहीये, काय झालं होतं दिशा सालियानच्या घरी, CDR रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज का समोर येऊ देत नाहीत? समित ठक्कर, साहिल चौधरी यांना अटक का केलं जातं आहे. हे घाबरतात म्हणून? असा सवाल देखील नितेश राणेंनी केला.
नितेश राणे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आहात पण असलेले सर्व पुरावे तुम्ही नष्ट करू शकत नाही, आमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत. सीबीआय हत्या की आत्महत्याचे संकेत देण्याचे काम करत नाहीत. त्यांचा रिपोर्ट आला की सगळं स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.