लष्कर प्रमुख गरजले; दहा पाकी सैनिकांनाही कंठस्नान घातले
नवी दिल्ली : भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणारे तीन तळ भारतीय लष्कराने तोफगोळ्यांचा तुफानी मारा करून उद्ध्वस्त केले. यात पाकिस्तानच्या सहा ते 10 सैनिकांचा खात्मा झाला, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी रविवारी सांगितले.
पाकव्याप्त वकाश्मिरमधील हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराने तोफखान्याचा वापर केला. केरन, तंगधर आणि नौगाव क्षेत्रात दहशतावादी सीमेच्या जवळ येत असल्याची पक्की माहिती लष्कराला मिळाली होती. त्याची खात्री केल्यानंतर आम्ही ही कारवाई केली. आम्ही तीन तळावर तोफगोळ्यांचा मारा केला. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे, असेही मेजर जनरल रावत म्हणाले.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानमधून दहशतवादी घूसवून येथील शांतता आणि सद्भावना तोडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान आहे, अशी माहिती गुप्तचरांकडून आम्हाला सातत्याने मिळत आहे. राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना तेथे चिथावणीखोर कृत्ये घडवणाऱ्या काही शक्ती पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळीही तंगधर भागात घुसखोरीचा झालेला प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला, असे लष्कर प्रमुखांनी सांगितले.
पाकिस्तानने आमच्या काही चौक्यांवर गोळीबार केला. त्यात आमचे काही नुकसान झाले. पण, त्यांनी घुसखोरी करण्यापुर्वी आम्ही त्यांचे तळ उद्ध्वस्त केले.तंगधर येथील तळही पूर्णत: नष्ट केला.