कणकवली: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येत आहे. त्यातच राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आज कणकवली येथील कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
‘मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपाला तर धोका दिलाच आहे, पण शिवसैनिकांनाही अंधारात ठेवले आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविणार असे सांगून स्वत:च ते मुख्यमंत्री बनले.त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप कर्ज माफी दिलेली नाही. तर अधिवेशनात मुख्यमंत्री विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते काय? हा तर ‘मुका’ मुख्यमंत्री असून त्यांनी विकास कामांना दिलेली स्थगिती ही केवळ तोडपाणी करण्यासाठीच आहे. अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, शिवसेना महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक भाजपासह युती करून लढली. मात्र, केवळ ५६ आमदार असताना हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना बाजूला टाकत आड मार्गाने महाआघाडी केली. तसेच महाराष्ट्राच्या सत्तेत आलेल्या सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवा. हे तीन पायाचे सरकार लोकहिताचे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम सर्वच विकास कामांना स्थगिती सरकारने दिली आहे. कर्जमाफीची खोटी आश्वासने उध्दव ठाकरे यांनी दिली. आता १ महिना झाला तरी कर्जमाफीचा शब्द का पुर्ण केला नाही ?
बुधवारी कणकवली मधील भगवती मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी जि़ल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सुरेश सावंत, रविंद्र शेटये, तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, महिला तालुकाध्यक्ष गितांजली कामत, स्वाती राणे, प्रज्ञा ढवण, बबलू सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.