पुणे – जिल्ह्यात शुक्रवार (दि. 23) पर्यंत मुसळधार पाऊस पडेल, त्यामुळे जिल्ह्यात हवामान खात्याने “यलो अलर्ट’ दिला आहे. घाट भागांमध्ये काही भागांत 51 ते 75 टक्के मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
अंदमान येथे आरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसला. तिथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील 24 तासांत त्याची तीव्रता संपणार आहे. मात्र, आता बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता सोमवार (दि. 19) पासून शुक्रवार (दि. 23) पर्यंत वाढणार असल्याने अनेक ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळाला. सलग तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी पाऊस बरसला त्यामुळे आता “पाऊस नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आहे.