येडियुरप्पा यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची भाजपची इच्छा नव्हती
बंगळूर -कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा भाजपच्या दृष्टीने नकोशा मुलासारखे आहेत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा नव्हती, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी सोमवारी केला.
कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी विधानसभेत 113 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. मात्र, येडियुरप्पा यांच्या पाठिशी 105 आमदारच आहेत. त्यामुळे जनमताचा कौल नसतानाही त्यांनी मागील दाराने सत्ता मिळवली. त्यांची कृती लोकशाही मुल्यांच्या विरोधातील आहे, असे म्हणत सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पा यांचे सरकार फार काळ टिकण्याबाबत साशंकता व्यक्त केली. कर्नाटकमधील काही आमदारांच्या बंडामुळे कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे मागील सरकार कोसळले.
त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारलेल्या येडियुरप्पा यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्या शक्तिपरीक्षेवेळी कॉंग्रेस आणि जेडीएसचे 17 बंडखोर आमदार अनुपस्थित राहिल्याचा लाभ येडियुरप्पा यांना मिळाला.मात्र, येडियुरप्पा सरकार केव्हाही कोसळेल. त्यामुळे कर्नाटकात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक होईल, असे भाकीत सिद्धरामय्या सातत्याने करत आहेत.
दरम्यान, निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर व्हावा. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी लढा द्यावा, अशी भूमिकाही सिद्धरामय्या यांनी मांडली.