नवी दिल्ली – वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 22 मार्च 2020 रोजी करोनाचा वाढता प्रकोप पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. लोकांना आपल्याच घरांत राहण्याचे आवाहन केले होते. लोकांनी वारंवार हात धुवावे, दो गज दुरी अर्थात सोशल डिस्टन्सचे पालन करावे आणि मास्क वापरावा यासह काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.
करोनाचा प्रसार थोपवण्यासाठी उघडण्यात आलेल्या मोहीमेची ही एक सुरूवातच होती. तो दिवस ऐतिहासिक ठरला होता. संपूर्ण देशभरात शांतता होती. ना वाहनांच्या हॉर्नचा आवाज होता, न रस्त्यांवर वर्दळ होती. येत होता तो फक्त पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज.
हे लॉकडाऊनचे ट्रायल आहे असा अंदाज तेव्हाही वर्तवला गेला होता. जो पुढे खराच ठरला. त्यावेळी करोनाचे भय सगळ्या विश्वात व्यापले होते. माणसे मरत होती. वेगवेगळे व्हिडीओ आपलोड होत होते. लॉकडाऊन लागला होता. कधी उघडणार आणि पूर्ववत कधी होणार याची कोणालाच कल्पना नव्हती. सगळीच अनिश्चितता होती.
करोनाने राजा आणि रंक, लहान आणि मोठा, कामगार आणि मालक, स्त्री आणि पुरूष या सगळ्यांनाच एकाच पातळीवर आणून ठेवले. त्याची भिती होती. मात्र इलाज नव्हता. सगळे आपापल्या घरात या भयाच्या छायेत टीव्हीसमोर बसून भयावह बातम्या ऐकत होते. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात अनेक महिने गेल्यानंतर अखेर निर्बंध शिथिल झाले. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. व्यवहार अंशत: सुरू झाले अन लसही तयार झाली.
भारताकडे आज करोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी दोन लसी तयार असून देशात लसीकरणाचे अभियानही सुरू करण्यात आले आहे. 16 जानेवारी 2021 रोजी त्याची सुरूवात झाली. आता या मोहीमेने चांगलीच गती पकडली असून संपूर्ण देशालाच लस दोन टप्प्यांत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, करोनाची लस आल्यावर करोना गायब होईल असे मानले जात होते. मात्र आज पाहिले तर चित्र त्यापेक्षा खूप वेगळे आहे. त्याचे कारण म्हणजे जनता कर्फ्यू लावण्यात आला होता, तेव्हा संपूर्ण देशभरात केवळ 360 पॉझिटिव्ह होते. आज देशातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3,34,646 आहे. एकट्या महाराष्ट्रातच दोन लाखांपेक्षा अधिक रूग्ण आहेत. 1,16,46,081 लोकांना करोना झाला आहे व अनेक लोक त्यातून बरेही झाले आहे. त्यावेळेच्या आजच्या स्थितीतला सगळ्यांत मोठा बदल म्हणजे साडेतीनशे रूग्णसंख्या असताना अभूतपूर्व अशी अनिश्चितता आणि भय होते. आज कोटीच्या घरात बाधित सापडल्यानंतर ते भय कुठेतरी नाहीसे झाले आहे. त्यामुळेच बेफिकिरीही आल्याचे दिसून येते आहे.
लस आली आहे. ती दिली जात आहे. मात्र तरीही आपल्याला आणखी बरेच महिने नियमांचे पालन करावे लागणार आहे, असे सांगितले जात असले तरी कुठेतरी या नियमांनाच तिलांजली दिली गेली असल्याचे दिसून येते आहे.
आज काय आहे स्थिती?
लस येण्यापूर्वी नागरिक प्रचंड गंभीर होते. हात वारंवार सॅनिटाइज करत होते. सोशल डिस्टन्स राखत होते. मास्क घालत होते. अनलॉकच्या सुरूवातीच्या टप्प्यात काही निर्बंध शिथील करण्यात आले. विवाह आणि अन्य सोहळ्यांना परवानगी दिली गेली. मंदिरेही उघडण्यात आली. मात्र लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ घेत आता करोना गेला अशी समजूत करून घेतल्याचे दिसते.
सोशल डिस्टन्सची तमा न बाळगता गर्दी करणे, विवाह सोहळ्यांना करोनापूर्वीच्या जल्लोषात आणि उत्साहात हजेरी लावणे, घोळक्याने गप्पा मारत उभे राहणे, विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडावर न लावता हनुवटीवर मास्क लटकवत ठेवणे असले प्रकार सर्रास सुरू आहेत.