यवत -येथे रहिवाशी कारणासाठी अकृषित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोबाइल टॉवरचे काम सुरु करण्यात आले आहे. हा भूखंड फक्त निवासी प्रयोजनासाठीच आहे. त्यामुळे याचा वापर फक्त रहिवाशी करणासाठीच करण्यात यावा, प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशी माधव घनशेट्टी, सचिन पालखे, मयूर अदापुरे, जोतीराम इंगवले, संतोष वाबळे यांनी ग्रामपंचायत यवत आणि गावाकामगार तलाठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मूळची जागा ही गुंड यांच्या मालकीची होती. त्यांनी सन 2011मध्ये यवत येथील गट नं.906/2/1 पैकी 5000 चौरस मिटर क्षेत्र रहिवाशी प्रयोजना साठी बिगरशेती करून घेतली होती. तत्कालीन दौंड-बारामतीचे प्रांतधिकारी यांनी सर्व बाबी तपासून हा भूखंड निवासी प्रयोजनासाठी अकृषित करण्याची परवानगी दिली होती.
भूखंड आकृषित झाल्यानंतर मूळमालक यांनी इतर व्यक्तींना विकले. अनेक नागरिकांनी निवासासाठी भूखंड खरेदी केले. यातीलच एक भूखंड खरेदी केलेल्या व्यक्तीने त्याच्या रहिवासी जागेत मोबाइल टॉवर बांधण्यासाठी खोदकाम सुरु केले. हे खोदकाम रहिवाशी बांधकामासाठी नसून ते मोबाइल टॉवर बांधण्यासाठी सुरु केल्याची माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना मिळताच त्यांनी येथील मोबाइल टॉवरला तीव्र विरोध करीत ग्रामपंचायत यवत आणि गावकामगार तलाठी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
निवासी भूखंडावर मोबाइल टॉवरचे काम सुरू केले आहे. याबाबत संबंधित भूखंड मालकाला बोलावून सत्यता तपासण्यात येईल. त्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल.
– राजाराम शेंडगे, ग्रामविकास अधिकारी, यवत