भुलेश्वर : जागृत देवस्थान तसेच जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र भुलेश्वर महादेवाची श्रावण यात्रा मंगळवार (दि. 21) पासून सुरू झाली आहे. मात्र, यंदा करोनामुळे इतिहासात प्रथमच सोमवारी (दि. 27) श्री भुलेश्वराची प्रातिनिधिक स्वरूपात यात्रा पार पडली. तर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त या यात्रेचे आकर्षण असणारा पालखी सोहळा व कावड यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. तर करोना हद्दपार होवू दे असेच साकडे भुलेश्वरास घालण्यात आले.
दर वर्षी श्रावणी यात्रेमध्ये कावड सोहळ्यामध्ये माळशिरस गाव व पंचक्रोशीतील यवत, राजुरी, आंबळे, पोंढे, व इतर गावातुन तसेच इतर तालुक्यातून या ठिकाणी कावडी येत असतात; परंतु सध्याची असणारी परिस्थिती व शासनाचे आदेश या सर्वानाचा विचार करता येतील कावड मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तर पहाटे येथील गुरव पुजारी यांनी शिवलिंगाला रुद्राभिषेक करून गाभाऱ्यात आकर्षक सजावट केली होती.
दुपारी 12 वाजता पाण्याच्या टाक्यावर देवाला आंघोळ घालून महाआरती करून डमरू वाजवत दरवर्षी पालखीमध्ये असणाऱ्या परंपरागत पेशवेकालीन मूर्तीऐवजी मंदिरातील मूर्ती पालखी ऐवजी हातामध्ये मूर्ती घेऊन हळू आवाजात वाजत-गाजत मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी सरपंच महादेव बोरावके, भुलेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरूण यादव, एकनाथ यादव, बाळकृष्ण गायकवाड व सर्व मानकरी उपस्थित होते.
दरवर्षी रविवारी रात्री 12 पासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करतात म्हणून जेजुरी पोलीस ठाणे व भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने वतीने रात्रीपासून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.