करंजे येथील यात्रेत उलाढाल नाहीच
वाघळवाडी – सोरटी सोमनाथचे प्रतिरुप मानले जाणारे सोमेश्वर मंदिर बारामती तालुक्यात आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्रावण मास चालू असून दर्शन घेण्यासाठी बारामती तालुक्यासह लगतच्या भागातून भाविकांची गर्दी होत आहे. परंतु, राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम येथील छोट्या-मोठ्या व्यावसायावर झाला आहे.
दरवर्षी श्रावण मास यात्रा महिनाभर चालू असते व त्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरामध्ये पहावयास मिळत होती. यातून या ठिकाणी मोठी उलाढाल होत होती. परंतु, मंदीचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे. मिठाईवाले, गृहउपयोगी वस्तू विक्रीते, खेळणीवाले तसेच हॉटेलांकडे ग्राहकांनी पाठ फिरल्याने हे सर्वच व्यावसायीक हवालदिल झाले असून आर्थिक उलाढाल अतिशय कमी होत आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे तेथील येणाऱ्या दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. मुंबईसह कोकण या भागातील कोळीबांधव हे सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये येथे दर्शनाकरीता येत असता परंतु, सध्या अशा भाविकांची संख्या रोडावली असल्याचे याचा परिणाम येथील किरकोळ व्यावसायांवरही झाला असल्याचे मिठाईवाले बाबू गायकवाड यांनी सांगितले.