नगर जिल्ह्यातील नेवासा येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यातील एक ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दोन्ही सत्ताधारी कॉंग्रेसच्या नेत्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. खाते, बंगले अशा क्षुल्लक कारणांसाठी आपसात सतत भांडत बसू नका अन्यथा संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकेदिवशी उद्विग्न होतील आणि तेच थेट राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर जातील, असे यशवंतराव गडाख यांनी म्हटले आहे. त्यांचे हे निरीक्षण बिनचूक आहे. उद्धव ठाकरे हे सरळमार्गी व रोखठोकपणे राजकारण करणारे नेते आहेत. रूसवे-फुगवे दूर करीत बसणे आणि कावेबाजपणे वागणे अशा स्वरूपाचे कॉंग्रेसछाप राजकारण त्यांना पसंत नाही. एक घाव आणि दोन तुकडे असाच त्यांचा आजवरचा बाणा राहिला आहे. त्यांना स्वतःला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नसताना केवळ शरद पवारांच्या आग्रहाने त्यांनी हे पद नाईलाजाने स्वीकारले आहे. त्यांच्या तयारीमुळेच विरोधात बसण्याचा कौल मिळालेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना थेट सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नाउमेद होतील अशी कृत्ये आता थांबवा, असा महत्त्वाचा सल्ला यशवंतरावांनी दिला आहे.
ठाकरे यांच्या स्वभाव शैलीचा अचूक अंदाज घेऊन त्यांनी हे महत्त्वाचे विधान केले आहे. हे सरकार तीन पक्षांचे आहे. त्यामुळे सत्तापदांसाठी खेचाखेची होणे स्वाभाविक होते. पण खातेवाटप झाल्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू राहिले. रोज एक जण रूसून बसत असल्याचे चित्र वृत्तवाहिन्यांवरून येत राहिले. या बातम्या पाहून सामान्य लोकांनाच या सरकारचे काही खरे नाही असे वाटू लागले आहे. तरीही राज्यात सत्तेवर आलेल्यांनी मात्र जनभावनेची फार फिकीर केल्याचे दिसून आले नाही. आपल्या वागण्यातून जनतेत चुकीचा मेसेज जातो आहे हे या लोकांनी कधी लक्षातच घेतले नाही. खाते वाटप होते ना होते तोच बंगल्याच्या वाटपावरूनही मंत्र्यांमधील रूसवे-फुगवे चव्हाट्यावर आले. त्यानंतर पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून मोठी धुसफूस झाली. गेले दोन महिने हा सारा प्रकार सुरू आहे आणि काही वेळा तो थिल्लरपणाच्या पातळीवरही गेलेला दिसला आहे.
कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच हे प्रकार झाले असे नव्हे तर खुद्द शिवसेनेतही हा प्रकार पाहायला मिळाला. तानाजी सावंत नावाच्या शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची नाराजीही चव्हाट्यावर आली. त्यांनी तर इतकी टोकाची भूमिका घेतली की जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपशीच घरोबा केल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेला अशा नाराजांना हाताळण्याचा अनुभव नाही. कारण त्यांच्याकडे आदेश संस्कृती आहे. पक्षाच्या नेतृत्वाने एकदा निर्णय घेतला की सर्वांनी तो निमूटपणे पाळायचा अशी संस्कृती शिवसेनेत आहे. पण इथले सगळेच वातावरण नवीन आहे. मित्र पक्षांशी जुळवून घेताना त्यांच्या बेशिस्तीला किती सहन करायचे हाही उद्धव ठाकरे यांच्यापुढील मोठा प्रश्न आहे. सरकार स्थापनेच्या काळातील बेशिस्त घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या उद्विग्नतेत आणखीच भर पडली असणार हे नक्की. त्यामुळे कायम आक्रमक असणारे उद्धव ठाकरे हे गेले काही दिवस मौनात गेल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांच्या देहबोलीतील या बदलांचा अर्थ यशवंतरावांनी अचुकपणे ओळखला आणि त्यांनी दोन्ही कॉंग्रेसजनांना समंजसपणे वागण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला कॉंग्रेसजन किती पाळतात हे पाहावे लागेल.
सुरुवातीचा काही काळ सोडला तर सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला आपल्यात पूर्ण सामावून घेण्याऐवजी दोन्ही कॉंग्रेसचे नेते आपसातच भांडत राहिलेले पाहायला मिळाल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे उद्धव यांच्या हातात राहणे कठीण आहे ही बाबही ठळकपणे समोर आली आहे. सरकार स्थापनेच्या काळातील या घडामोडी पाहिल्यानंतर पुढील पाच वर्षे नेमके काय होईल याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मुळात आता पाच वर्षे हे सरकार टिकेल की नाही अशीच मूलभूत शंका उपस्थित होऊ लागली आहे. ही तर आताशी कुठे सुरुवात आहे. पुढेपुढे त्यांच्यात बारीकसारीक निर्णयांवरूनही मोठे खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला दरवेळी समजून घेण्याची सोशिकता उद्धव ठाकरे यांच्यात किती आहे यावर हे सरकार किती काळ तग धरणार हे अवलंबून असेल.
वास्तविक एका वेगळ्या राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे यांनी हे सरकार चालवायला घेतले आहे. त्यांना भाजपचा हिशेब चुकता करायचा होता. तो त्यांनी केला. पण पुढे पाच वर्षे हा कारभार हाकणे ही सोपी गोष्ट नाही. मुळात हे राज्य सध्या पूर्ण आर्थिक अडचणीत आले आहे. भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला निधी देण्याच्या बाबतीत सतत अन्यायकारक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने राज्याचा जवळपास 45 हजार कोटी रुपयांचा निधी थकवला आहे. जीएसटी नुकसानभरपाईही वेळेवर मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा अन्य संस्थांना राज्यातर्फे निधी देण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. अनेक प्रकारचे अनुदान थकले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या नवीन कर्जमाफीचा बोजाही उचलायचा आहे. ही सारी आव्हानात्मक परिस्थिती पाहिल्यानंतर त्याचा सामना करताना मुळात सरकार भक्कम आणि एकहाती असणे अधिक महत्त्वाचे होते.
येथे मात्र प्रत्येक निर्णयावर तीन पक्षांची तीन तऱ्हेची भूमिका व्यक्त होऊ लागली तर सारेच मुसळ केरात जाण्याचा धोका आहे. त्या स्थितीत उद्धव ठाकरे यांची कसोटी लागणार आहे. त्यांना स्वतःला राज्यकारभाराचा थेट अनुभव नाही. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनुभवी व जाणकार नेत्यांनी त्यांना मनापासून सहकार्य दिले तरच हा गाडा बरा चालू शकेल. पण सरकार चालवणे ही आपली एकट्याची जबाबदारी नाही अशा थाटात दोन्ही कॉंग्रेसचे नेते आतापासूनच वावरताना दिसत आहेत. हे काही बरे लक्षण नाही. दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना मनस्ताप देण्याऐवजी त्यांना उमेद देण्याचा प्रयत्न करायला हवा ही यशवंतराव गडाखांची सूचना एकदम रास्त आहे.