नेवासा – यशवंत सामाजिक प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारे कृतज्ञता पुरस्कार यावर्षी ग्रामविकासातून गावाचा कायापालट करणारे, आदर्शगाव योजनेचे प्रणेते पदमश्री पोपटराव पवार,शून्यातून उद्योजक विश्व उभे करणारे, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारे हनुमंतराव गायकवाड,महिलांना स्वावलंबन शिकवणाऱ्या कमलताई परदेशी यांना जाहीर झाले असल्याची माहिती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आ शंकरराव गडाख यांनी दिली.
सोनई ता नेवासा येथील मुळा पब्लिक स्कुलच्या प्रांगणात रविवार दि 29 जाने 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम जेष्ठ साहित्यिक मा खा यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पोपटराव पवार यांनी 1972 मध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच दुष्काळात हिवरे बाजार गावाला देखील याचा फटका बसला. शेती आणि पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हिवरे बाजारचे हाल होऊ लागले होते उत्पन्नाचे साधनच उरले नव्हते. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली होती ही अवस्था तब्बल 25 वर्षे होती.
1989 साली ‘पोपटराव पवार’ हे गावाचे सरपंच झाले. पोपटराव पवार हे गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण झालेले नागरिक होते. त्यांनी गावात अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे गावाचं रूप पालटू लागलं. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंधारणाचे नियोजन त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव योजनेचे ते कार्याध्यक्ष आहेत.पोपटराव पवार यांनी विकसित केलेले हिवरेबाजारचे मॉडेल देशासह जगभरात प्रसिद्ध झाले आहे .महाराष्ट्र शासनाने त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
हणमंतराव गायकवाड हे भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सेवा कंपनी ‘भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेड’ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी स्वच्छता राखण्याच्या कामापासून ते साखर कारखाना चालविणे आणि औषध उत्पादन , तत्काळ सेवा पुरवणे, घन कचरा व्यवस्थापन, अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे. त्यांच्या बी व्ही जी ग्रुप मार्फत त्यांनी 70 हजार लोकांना रोजगार दिला आहे.
महाराष्ट्रातील गावा ,गावातील शेती दत्तक घेऊन शेतकऱ्यांना स्व:यपूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथुन येऊन त्यांनी उद्योग विश्वात घेतलेली भरारी सर्वांना प्रेरणादायी अशीच आहे त्यांना आत्तापर्यत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कमलताई परदेशी यांची ओळख मसाला क्वीन म्हणून आहे त्यांनी सुरू केलेल्या छोट्याश्या उद्योगाचे रूपांतर एका बहुउद्देशीय औद्योगिक कंपनीत झाले असून.त्यांची कंपनी अंबिका मसाले या नावाने 42 प्रकारचे मसाले तयार करते त्यांना बिग,ताज सारख्या नामांकित हॉटेल्समध्ये व बाजारात मोठी मागणी आहे.त्यांच्या कंपनीची उलाढाल 80 कोटींची आहे.दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या एका महिलेने बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून त्यांच्यासारख्याच 200 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
कमलताई परदेशी यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या आशा मान्यवरांच्या आयुष्याचा प्रवास हा जिद्दीचा व सातत्याचा असतो म्हणूनच तरुणांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ व प्रेरणा घ्यावी असे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आ शंकरराव गडाख यांनी केले आहे.