नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहावे अन्यथा जनमानसातील त्यांची प्रतिमा अधिक खराब होईल असे मत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधक समजले जातात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळावर त्यांनी टीका केली आहे. सिन्हा यांनी मागच्यावर्षी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.
काही काळ कॉंग्रेसचा कारभार अध्यक्षीय मंडळामार्फत चालवला जावा, असा सल्लाही सिन्हा यांनी दिला आहे. गांधी त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले नाहीत तर जनमानसातील त्यांची प्रतिमा अधिक खराब होईल. काही काळ पक्ष अध्यक्ष मंडळामार्फत किंवा अन्य कुठली व्यवस्था करावी, असे यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.
यापूर्वी सिन्हा यांनी कॉंग्रेसने बिहार, झारखंड, दिल्ली आणि अन्यत्र आघाडी निश्चित करावी. आधीच भरपूर उशीर झाला आहे असे ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. अजूनही ते त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी कॉंग्रेस आणि यूपीएच्या घटक पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गांधी यांनी मन बदललेले नाही.