पक्षाचे नाव गुलदस्त्यात; सन्मानासाठी खटाटोप
सुरेश डुबल
कराड – विधानसभेआधी कराड दक्षिणमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. यांनी नुकताच कार्यकर्ता निर्धार मेळावा आयोजित केला होता. यात यादवांनी दक्षिणमधून निवडणूक लढवावी, असा सूर उमटला. त्यामुळे दक्षिणच्या राजकीय पटलावर नवीन उमेदवाराची एन्ट्री होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील हाय होल्टेज ड्रामा होणाऱ्या मतदार संघात कराड दक्षिणचे नाव आवर्जून घेतले जाते. मागील निवडणुकीत येथे जबरदस्त लढत झाली होती. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, भाजपचे डॉ. अतुल भोसले, शिवसेनेतून अजिंक्य डी. वाय. पाटील या तगड्या उमेदवारांची लढत रंगतदार झाली. आता या दक्षिणेच्या पटलावर राजेंद्र यादव हे आपले नशीब आजमावण्यास तयार झाले आहेत.
1999 मध्ये यादवांची कराड नगरपालिकेत एन्ट्री झाली. नगरसेवक ते उपनगराध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली. या काळात बऱ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी त्यांच्या गटाचा वापर केला, असा आरोप नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यादवांची एन्ट्री सध्या तरी फिक्स मानली जात आहे. उमेदवारीबाबत चर्चा झाली. मात्र, कोणत्या पक्षातून उमेदवारी घेणार? की अपक्ष लढणार? याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
कराड नगरपालिकेत यादवांचे अकरा नगरसेवक आहेत. निर्धार मेळाव्याला राजेंद्र यादव यांनी रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील त्यांच्या गटांतील नेते व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, सौ. स्मिता हुलवान, अतुल शिंदे, गजेंद्र कांबळे, सुप्रिया खराडे, आशाताई मुळे, किरण पाटील, बाळासाहेब यादव, निशांत ढेकळे उपस्थित होते.
आजपर्यंत कराड पालिकेपर्यंत मर्यादित असणारे यादव हे दक्षिण स्वारीसाठी सज्ज झाले आहेत. तसेच संघर्ष करायची तयारी आमची असल्याने राजेंद्र यादव यांनी विधानसभा लढवावी, असा निर्धारच नुकत्याच झालेल्या मेळाव्यात यादव समर्थकांनी केला आहे. या मेळाव्यात सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर बोलायला उठलेल्या यादवांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
आमचा वापर करून जर कोणी राजकारण करत असेल. तसेच आम्हाला केवळ गृहीत धरले जात असेल तर आम्ही सर्वांचे बारा वाजवू. निवडणूक जिंकायची असेल तर यादवांचे कार्यकर्ते हवेत. आणि विजय झाला की दुसऱ्याच दिवशी यादव गटाला संपविण्याच्या खेळी करतात, अशी बऱ्याच वर्षांपासूनची खदखद आहे. यादव व त्यांच्या गटाला योग्य ट्रीटमेंट येथे मिळत नाही. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात हे होऊ नये, यासाठीच यादवांनी हा खटाटोप केला आहे.
पालिकेतही धुसफूस
पालिकेतील राजकारण करण्यासाठी यादव गटाचे कार्यकर्ते हवेत. मात्र यादव नेते व्हायला नकोत, असे म्हणत यादव यांनी कराड नगरपालिकेतील सद्यस्थिती वर्तविली. चांगला विचार होता म्हणूनच दोन वर्षे आम्ही गप्प राहिलो. मात्र आता त्यांना आपली ताकद दाखविण्याची वेळ आली असल्याची टीका नगरपालिकेतील सध्याच्या वातावरणावर भाष्य करत भाजप उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे नाव न घेता केली. यावरून पालिकेत सध्या काही आलबेल नसून धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे.