मुंबई – सचिन वाझेंची नियुक्ती होणार असल्याचे कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाझेंना पोलीस दलात घेऊ नका, अशी विनंतीही केली होती, असा गौप्यस्फोट अबू आझमी यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी वाझे यांच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका करतानाच या सर्व प्रकाराला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वाझेंना पोलीस दलात घेण्यात येणार असल्याचे कळल्याबरोबर मी पवार, राऊत आणि देशमुखांना भेटलो होतो. पण परमबीर सिंग यांनी या दोघांना असा काय सल्ला दिला की त्यांना पोलीस दलात घेण्यात आले, असा सवाल करतानाच वाझेंना घेऊ नये म्हणून आपण आंदोलनही केले होते असे ते म्हणाले.
ख्वाजा युनुस हत्येची केस सुरू असतानाही वाझेंना पोलीस दलात घेणे ही महाविकास आघाडीची सगळ्यात मोठी चूक होती. तसेच मी सत्तेत असूनही सांगतो की, ज्या दिवशी वाझेंचा विषय विरोधकांनी हातात घेतला, त्याच दिवशी त्यांना निलंबित करायला हवे होते. पण वाझेंना निलंबित केले गेले नाही, ही सरकारची दुसरी मोठी चूक होती, असेही आझमी यांनी म्हटले आहे.