लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 444 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसअखेर भारताने 40 षटकांत तीन गडी गमावून 164 धावा केल्या आहेत.
भारताला शेवटच्या दिवशी 90 षटकांत 280 धावा करायच्या आहेत. भारताच्या अजूनही सात विकेट्स शिल्लक आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 60 चेंडूत नाबाद 44 धावांवर तर अजिंक्य रहाणे 59 चेंडूत नाबाद 20 धावांवर खेळत होते.आतापर्यंत या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 118 चेंडूत 71 धावांची भागीदारी झाली आहे.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही उत्कृष्ट झाली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. शुभमन गिल 19 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.
यानंतर टीम इंडियाने सलग दोन षटकांत दोन विकेट गमावल्या. 20व्या षटकाच्या सुरुवातीला चांगली फलंदाजी करणारा कर्णधार रोहित शर्मा ऑफस्पिनर नॅथन लायनच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या नादात एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याला 60 चेंडूत 43 धावा करता आल्या.
यानंतर पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजारा पॅट कमिन्सच्या चेंडूवर अप्पर कट मारण्याच्या नादात विकेट गमावून बसला. पूजारा झेलबाद झाला. त्याला 47 चेंडूत 27 धावा करता आल्या.