साउदम्पटन – भारत व न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतील पहिल्या दिवसाच्या खेळावर मुसळधार पावसाचे पाणी फेरले गेले. अर्थात, या सामन्याचा निकाल लागावा यासाठी ठेवण्यात आलेला राखीव दिवस आता उपलब्ध होणार असल्याचे संकेत आयसीसीने दिले आहेत.
जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाकडून दमदार खेळाची अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त होत असतानाच पहिल्या दिवशी सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाल्याने क्रिकेट शौकिनांची घोर निराशा झाली. कसोटी क्रिकेटच्या गेल्या 144 वर्षांच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत संततधार पावसाने सुरुवातीपासूनच व्यत्यय आणल्याने चाहत्यांपेक्षा जास्त निराशा दोन्ही संघातील खेळाडूंना आली.
साउदम्प्टनमधील रोझ बाऊलच्या मैदानावर हा सामना खेळवला जात असून गुरुवारी रात्रीही मुसळधार पाऊस झाला होता. काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शुक्रवार सकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. पंचांनी वेळोवेळी मैदानाची पाहणी केल्यावर पहिल्या दिवसाचा खेळ होणार नसल्याचेही जाहीर केले.
संघ जाहीर करण्यात न्यूझीलंडकडून विलंब
न्यूझीलंड संघाने या सामन्यापूर्वी सकाळी आपला 11 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर केलेला नसल्याने भारतीय संघाला त्यांच्या रणनीतीचा अंदाजच आलेला नाही. जर पाऊस थांबला व काही वेळानंतर सामना सुरू होणार असेल तरच खेळपट्टी पाहिल्यावर अंतिम संघ जाहीर केला जाईल, असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी सांगितले आहे.
खेळपट्टीची जोवर पाहणी केली जात नाही तोपर्यंत संघ जाहीर करणार नाही. जर खेळपट्टीवर गवत राखले गेले असेल तसेच हवामानही गोलंदाजांना लाभदायक असल्याचे स्पष्ट होत असेल तरच त्यावर विचार करून संघ जाहीर केला जाईल. पण जर खेळपट्टीवर गवत नसेल आणि कव्हर्स काढल्यावर खेळपट्टी ठणठणीत असेल तर त्यानुसार संघ निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतही संघबदल करू शकतो
विराट कोहलीने जरी या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला असला तरीही जोवर नाणेफेक करण्यात येत नाही तोपर्यंत संघात बदल करण्यास परवानगी असते. त्यामुळे जर खेळपट्टीचे स्वरूप बदलले असले तर पाहणी केल्यावर कोहली याबाबत निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.