– अमित डोंगरे
भारतीय संघ इंग्लंडला आता दाखल होऊन रुळलाही असेल. सराव सामन्यात ज्या पद्धतीने प्रमुख फलंदाजांनी खेळ केला ते पाहता संघाच्या सरस कामगिरीचा विश्वास वाटतो. मात्र, कसोटी अजिंक्यपदाचा सामना इंग्लंडमध्ये आणि प्रतिस्पर्धी संघ न्यूझीलंड असे समीकरण असल्याने तेथील वातावरण व खेळपट्टीचे स्वरूप यांच्यासह भारताच्या आक्रमक मानसिकतेच्या फलंदाजांची संयमी खेळीचीच कसोटी लागणार आहे.
मुळातच इंग्लंडमध्ये सध्या पुण्यासारखेच वातावरण आहे. कधी पाऊस, कधी थंडी तर कधी प्रचंड ऊन त्यामुळे खेळाडूंना वातावरणाशी जुळवून घेताना प्रचंड तारांबळ उडाली असणार. मात्र, तरीही आपल्याच संघातील सर्व खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी दोन संघ तयार केले गेले व त्यांच्यातच सराव सामने खेळवले.
या सामन्यात कर्णधार विराट कोहली याच्यासह रोहित शर्मा, लोकेश राहुल यांनी तर भक्कम खेळी केली. मात्र, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या ऋषभ पंत यानेही शतकी सराव केला. याच सरावात भारताच्या प्रमुख फलंदाजांना ड्युक्स चेंडूवर फलंदाजी करण्याचाही महत्त्वपूर्ण सराव मिळाला आहे. त्यातच जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा यांच्यासह रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीवर बॅकफूट आणि फ्रन्टफूटवर तंत्रशुद्ध फलंदाजी करण्याचाही सराव करता आला. अर्थात जे सरावात होते तेच प्रत्यक्ष मैदानावरही घडते असे समजण्याचे कारण नाही.
भारतीय संघाचा समतोल पाहिला तर पहिले पाच फलंदाज न्यूझीलंडला डोकेदुखी ठरतील असेच सांगितले जात असले तरीही ते स्विंग व उसळणाऱ्या चेंडूंवर त्यांची कसोटी लागणार आहे. कर्णधार कोहली, रोहित, पंत व राहुल वगळता अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या दोघांवरच खरेतर संयमी फलंदाजीची जबाबदारी राहणार आहे. यापूर्वी परदेशात गेल्यावर भारताचे वाघासारखे फलंदाज कागदी ठरत होते. मात्र, गेल्या दोन दशकांपासून डरकाळी फोडताना दिसतात हेदेखील विसरता कामा नये.
इंग्लंडमधील वातावरण कसेही असले तरीही खेळपट्टी सुरुवातीचे दोन दिवस तरी वेगवान व स्विंग गोलंदाजीसाठी नंदनवन ठरते यात शंका नाही. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना काहीशी मदत मिळते. अश्विन व जडेजा न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी अत्यंत धोकादायक ठरतील हे तेदेखील जाणून आहेत. कोहलीच्या नेतृत्वात प्रगती होत आहे ही चांगली बाब आहे. मात्र, वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीत गेल्या दीड वर्षापासून तो निराशाजनक कामगिरी करत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये असे म्हणले जाते की, फलंदाजीला मैदानात उतरल्यावर पहिली दहा षटके गोलंदाजांना आदर द्या नंतरचा संपूर्ण दिवस त्यांना तुम्हाला आदर द्यावा लागेल. ही गोष्ट ज्या धीरगंभीर राहुल द्रविडने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत जपली, तीच आता कोहली आणि कंपनीला जपायची आहे.