साउदम्पटन – कर्णधार विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी थोडीफार चमक दाखवल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताला पहिल्या डावात द्विशतकी मजल मारता आली. भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपला. न्यूझीलंडच्या काएल जेमिसनने 5 गडी बाद केले.
यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने दिवसाखेर २ गडी बाद १०२ इतकी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडचे सलामीवीर लॅंथम व कॉन्वे यांनी अर्धशतकीय भागीदारी केली. मात्र लॅंथम (३०) याला अश्विनने तर कॉन्वेला (५४) इशांत शर्माने तंबूत परत पाठवले.
तत्पूर्वी, रविवारी तिसऱ्या दिवशीही अंधूक प्रकाशामुळे खेळ अर्धा तास उशिरा सुरू झाला. भारताने 146 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी सावध फलंदाजी केली. मात्र, कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो 44 धावांवर काएल जेमिसनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाल्यावर रहाणेला एकही फलंदाज साथ देऊ शकला नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या ऋषभ पंतनेही निराशा केली.
रविवारचा खेळ सुरू झाल्यावर कोहली व रहाणेने मोठ्या खेळीची आशा दाखवली होती. मात्र, कोहलीपाठोपाठ रहाणेही अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने रहाणेला 49 धावांवर बाद केले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारताला द्विशतकी मजल मारून दिली.
3 चौकारांसह 22 धावांची खेळी केल्यानंतर टीम साऊदीने अश्विनला बाद केले. त्यानंतर जेमिसनने ईशांत शर्मा व जसप्रीत बुमराहला बाद केले. ट्रेन्ट बोल्टने अष्टपैलू रवींद्र जडेजाला बाद करत भारताचा डाव संपवला. न्यूझीलंडकडून जेमिसनने 31 धावांत 5 बळी घेतले. बोल्ट आणि वॅगनरने प्रत्येकी 2 बळी घेतले.