नगर – जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून काम करताना आपण चुकीचे काम करणाऱ्यांना कधीच पाठीशी घातलेले नाही, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
विखे म्हणाल्या की, जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी आपल्याकडे 27 जून रोजी पत्रव्यवहार करून अकोले तालुक्यातील अपहार झाल्याचे म्हटले होते. ते पत्र आपल्याकडून संबंधितांना 4 जुलै रोजी पाठविण्यात आलेले आहे. अकोलेतील तो प्रश्न त्यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानंतर आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश केलेला आहे.
त्यासाठी आठ दिवसांची मुदतही दिली होती. ती उद्या (ता. 18) रोजी पूर्ण होत आहे. उद्या होणाऱ्या स्थायी सभेत त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर त्याला तेथे गटविकास अधिकारी असणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांना निलंबन करून चौकशी होऊ शकत नाही.