कराड/ मुंबई : अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यांना बंड करण्यामागे मी आहे, हे म्हणणे योग्य होणार नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केल्यानंतर ते कऱ्हाड येथे पत्रकारांशी बोलत होते.
भाजपासोबत जाण्याचा निर्णय हा अजित पवार यांचा व्यक्तीगत होता. तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच नव्हता. त्या निर्णयाला आम्ही समर्थन दिलेले नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार येईल, यात तिळमात्र शंका नाही. या तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र बसून घेतला होता. त्याला अजित पवार उपस्थित होते, असे पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्याशी बंडानंतर आपला कोणताही संपर्क झाला नाही. अजित पवार यांच्या बंडाला माझा कोणताही सहभाग असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या सहकाऱ्यांना मी ते स्पष्ट सांगितले आहे. अजित पवार हे पक्षाचे नेते म्हणून सरकार स्थापनेच्या बैठकीस उपस्थित होते. त्यांना त्यांची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार होता. मात्र असा निर्णय घेण्याचा निर्णय कोणाही एका व्यक्तीला नाही. अजित पवार यांना अंमलबजावणी संचनालयाच्या चौकशीची भीती वाटत होती का? असे विचारले असता त्यांनी मला कल्पना नाही, असे सांगितले.
सत्ता स्थापनेचा दावा करून पार्टी विथ डिफरन्स हे या पक्षाने सिध्द केले आहे,असा टोला लगावत पवार म्हणाले, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असा दावा भारतीय जनता पक्ष नेहमी करते. मात्र त्यांचे वेगळेपण उघड झाले आहे. अजित पवार यांच्या पक्षातून निलंबनाचा निर्णय पक्ष घेईल असे त्यांनी सांगितले. निवडणुकांच्या तोंडावर प्रचारात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करणे ठिक आहे. पण सरकार चालवताना त्याची व्यवहार्यता सर्व बाजूने तपासावी लागते, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दरम्यान, कराड येथलि कार्यक्रम आटोपून पवार मुंबईला पोहोचले. त्यांनी सिल्व्हर ओक या निवास स्थानी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.