मुंबई – देशात निर्माण झालेल्या कोळशाच्या तुटवड्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
खाणीत कोळसा असताना खणीकरण होत नाही. कोळसा परदेशातून आयात होत आहे. या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
देशात कोळसा मिळत नाही. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत. कोळसा आयात करुनही उपलब्ध होत नसून आयातीमुळे देशातील परकीय चलन जास्त खर्च होत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
युपीएचे सरकार असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे, त्याची निर्मिती झाली पाहिजे या भूमिकेतून पॉलिसी निर्माण केली. कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या त्यावेळी भाजपने कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते. त्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या, त्या आजपर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.