देवेंद्र फडणवीसांचे पत्र ः “सीएम फेलोशिप’संदर्भात पुनर्विचार करण्याची मागणी
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून “सीएम फेलोशिप’ कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरेंना सविस्तर पत्र लिहले आहे. कार्यरत फेलोजचा कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये संपत आहे. मात्र, राज्य सरकारने त्याआधीच या फेलोजच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश गेला आहे, असे मत त्यांनी पत्रात व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीएम फेलोशीप कार्यक्रमाचा मी कधीही राजकीय वापर होऊ दिलेला नाही. फेलोजने नेहमी प्रशासनासोबत काम केले. या कार्यक्रमातून फेलोजच्या ज्ञान आणि अनुभवाच्या कक्षा रुंदावतील आणि शासनालाही त्यांच्या सहभागाचा उपयोग होईल, अशी या कार्यक्रमाची रचना आहे. राज्याने हा कार्यक्रम सुरु केला तेव्हा देशात कोठेही असा कार्यक्रम सुरु नव्हता. मात्र, आता पंजाब, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड, दिल्ली अशा अनेक राज्यांनी असा कार्यक्रम अमलात आणण्यास सुरुवात केली.
आपल्या नेतृत्वातील सरकारने सीएम फेलोशिप कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मला समजले. आपण मागील 5 वर्षांतील कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा अवश्य आढावा घ्यावा. योग्य बदलासह तो नव्या स्वरुपात अमलात आणावा. ते अधिक संयुक्तिक होईल. सध्या कार्यरत फेलोजचा कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये संपत आहे. मात्र, राज्य सरकारने त्याआधीच या फेलोजच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
किमान त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळावी, असे मला आवर्जून वाटते. आवश्यक बदलांसह फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याच्या आणि कार्यरत फेलोजना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करु देण्याच्या माझ्या मागणीचा विचार करावा, असेही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.