मुंबई – पुणे शहरात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धे नांदेडचं प्रतिनिधीत्व करणारा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पैलवान शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवून विजय मिळवला. मात्र ही स्पर्धा संपल्यानंतर आता एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे.
या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख याची पैलवान महेंद्र गायकवाड याच्यासोबत कुस्ती झाली होती. आणि या स्पर्धेत सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी चर्चांना उधाण आले आहे. ‘माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय’, असेही सिकंदर शेख याने म्हटले.
दरम्यान, ‘महाराष्ट्र केसरी’चा दावेदार मानल्या जाणाऱ्या सिकंदर शेखने आता सांगलीतील विसापूर केसरीचं मैदान मारलं असून, सर्वच स्तरातून त्याच कौतुक करण्यात येत आहे. यावेळी त्याने पंजाबच्या पैलवानाला पाच मिनिटात धुळ चारली. महाराष्ट्र केसरी नंतर सिकंदर थेट सांगली जिल्ह्याच्या स्पर्धेत उतरला होता.
या ठिकाणी सिकंदर शेखने आपला संपूर्ण दम दाखवला असून, पंजाबचा पैलवान ‘नवजीत सिंग’ला धूळ चारली आहे. सांगलीच्या या स्पर्धेत देशभरातून मल्ल आले आले होते. त्यामुळे याठिकाणी कुस्ती प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.