-माधव विद्वांस
भारतातील पहिले रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा आज जन्मदिन. (16 फेब्रुवारी 1876 – 6 मे 1966) उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म मुर्डी (जि. रत्नागिरी) येथे झाला.
भारतातील पहिल्या पाच रॅंग्लरमध्ये 3 कोकणातील होते. रॅंग्लर चंद्रकांत पेंडसे हे पण मुर्डी गावचेच. श्री. ना. पेंडसे हे पण याच गावातील. वडील पुरुषोत्तम केशव परांजपे (परांजप्ये) धार्मिक वृत्तीचे होते. आई गोपिकाबाई ह्या टिळक कुटुंबातील होत्या. परांजपे यांचा पहिला विवाह 1892 साली द्वारका भावे यांच्याशी झाला होता. त्यांचे निधन झाल्यावर पाच वर्षांनी सीताबाई जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सीताबाईंचे वर्ष 1931 मध्ये इंग्लंडमध्ये निधन झाले. समाजसेविका, अभिनेत्री, नाटककार, दिग्दर्शक, लेखिका शकुंतला परांजपे यांच्या कन्या व अभिनेत्री सई परांजपे नात. रॅंग्लर परांजपे नास्तिक व सुधारणावादी होते.
परांजप्यांचे प्राथमिक शिक्षण अंजर्ला, मुर्डी व दापोली येथे झाले. त्यांचे पुढील शिक्षण मुंबईस झाले. त्यावेळी आतेभाऊ महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याकडे राहिले होते. वर्ष 1891 मध्ये मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 1892 साली धोंडो केशव कर्व्यांचे बरोबर परांजपे पुण्यास आले. 1896 मध्ये ते पहिल्या वर्गात बी.एस्सी. उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढे भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून त्यांना केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाला.
तेथील मॅथेमॅटिकल ट्रायपॉस परीक्षेत जॉर्ज बर्थव्हिसल यांच्याबरोबर सर्वप्रथम येऊन त्यांनी “सीनिअर रॅंग्लर’ हा बहुमान संपादन केला. 1899 ते 1901 च्या दरम्यान पॅरिस व गटिंगेन विद्यापीठांत त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले. 1901 साली ते भारतात परतले आणि आयसीएसचा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा) मोह टाळून फर्गसन कॉलेजात प्राचार्य व गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले (1902-24).
प्राचार्य पदावरील 22 वर्षांच्या प्रदीर्घ काळात परांजप्यांनी फर्गसन कॉलेजला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. वर्ष 1921 साली तत्कालीन मुंबई सरकारने रॅंग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. वर्ष 1927 साली लंडनच्या “इंडिया हाउस’चे कामकाज रॅंग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी 6 वर्षे काम पाहिले. वर्ष 1944 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. वर्ष 1956 साली रॅंग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.
तत्कालीन राजकीय, सामाजिक चळवळीतही त्यांनी भाग घेतला. धार्मिक कर्मकांड, ईश्वर, परलोक, पुनर्जन्म इ. गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. ते पक्के इहवादी व समाजसुधारणेचे कडवे पुरस्कर्ते होते. न्या. रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नेमस्त राजकारणाचा त्यांनी पुरस्कार केला. ब्रिटिश सरकारने कैसर-इ-हिंद सुवर्णपदक (1916) व नाइटहूड (1942) देऊन त्यांना सन्मानित केले. रॅंग्लर परांजपे यांचे 6 मे 1966 रोजी वयाच्या 91व्या वर्षी पुण्यात निधन झाले.