पिंपरी -दहावीच्या परीक्षा संपल्याने काही विद्यार्थ्यांना आनंद तर काहींना दुःख झाल्याचा भाव चेहऱ्यावर होता. तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे लेखी परीक्षेचा ताण काही विद्यार्थ्यांना होता. सोमवारी पेपर देऊन वर्गा बाहेर आल्यावर हुश्श….! संपली परीक्षा, असेही काहींना वाटत होते.
सलग दोन वर्षे ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा घ्यावी, असा अनेकांचा सूर होता आणि प्रत्यक्षात त्या झाल्या. दोन वर्षांनी आपल्या वर्गमित्रांना परीक्षेच्या निमित्ताने का होईना भेटता आले याचा विद्यार्थ्यांना आनंद होता.
सोमवारी (दि. 4) शेवटचा पेपर दिल्यावर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. परंतु आत शाळा संपली, पुन्हा रोज हे मित्र एकत्र भेटणार नाहीत, याचे दुःखही काहींना होते.
मागील दोन वर्षे बाहेरगावी जाता आले नव्हते. त्यामुळे यंदाची सुट्टी मजेत घालविण्याचा तसेच सुटीत काय करायचे त्याचेही काही विद्यार्थ्यांनी नियोजन केले आहे. काहीजण बाहेरगावी जाणार आहेत. तर, काही क्लास आणि इतर छंद जोपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी
परीक्षा संपल्यावर वर्गाबाहेर आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी काढली. काहींनी आपल्या शाळेची आणि शालेय जीवनाच्या आठवणी म्हणून शाळेचे नामफलक दिसतील अशा “पोज’ दिल्या. काहींनी आपल्या “स्लॅम बुक’मध्ये आठवणी लिहून घेतल्या. तर काहींनी गणवेशावर सर्व मित्रांच्या सह्या घेतल्या.