नवी दिल्ली : करोना लसीकरणाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या वाईट कामगिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का असा थेट सवाल आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी उपस्थित केला. भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात राजन बोलत होते.
‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली होती. मागील काही काळामध्ये सरकार किंवा सरकारच्या जवळच्या व्यक्तींकडून अनेक खासगी कंपन्यांवर किंवा त्यांच्याशीसंबंधित व्यक्तींवर बेछूट आरोप करण्यात आल्याचे प्रकार घडले असून ‘इन्फोसिस’ हे त्यामधील ताजे उदाहरण आहे.
“हे वक्तव्य काहीच कामाचं नाहीय असं मला वाटतं. करोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगलं काम न करणाऱ्या सरकारला तुम्ही दोष देत देशविरोधी म्हणणार का? तुम्ही त्याचा चूक म्हणता आणि लोक चुका करत असतात,” असे मत राजन यांनी व्यक्त केले. जीएसटी हे त्याचं उदाहरण असल्याचेही राजन यांनी म्हटले. “जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मला फार योग्य वाटलं नाही. ते अजून चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. मात्र या चुकांमधून शिकलं पाहिजे. त्यांचा वापर तुमचे जुने हेवे दावे काढण्यासाठी होता कामा नये,” असा टोला राजन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना लगावला.
‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटले होते.
वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप पांचजन्यच्या ताज्या अंकात करण्यात आलेला. ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.
‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते, असे नमूद करून या लेखात म्हटले आहे, की अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो. सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत.
करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे. भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना अशी शंका लेखात व्यक्त केली आहे. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केली असल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा सवालही लेखात करण्यात आला होता.