बाह्यवळण मार्गाच्या कामासाठी उरुळीदेवाचीत उपहासात्मक कार्यक्रम
– महादेव जाधव
कोंढवा – जिल्ह्यातील सर्वाधिक निकृष्ट व दुरवस्था झालेला रस्ता म्हणून मंतरवाडी ते खडीमशीन चौक या बाह्यवळण मार्गाचा उल्लेख आता केला जाऊ लागला आहे. याच कारणातून उरुळीदेवाची ग्रामस्थांनी उपहासात्मकरित्या “सर्वाधिक निकृष्ट रस्ता’ पुरस्कार सार्वजनिक बांधकाम खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्कार वितरण सोहळा याच खड्डेमय रस्त्यावर घेण्याचे नियोजन असून कार्यक्रमावेळी पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात धुळीची उधळण करण्यात येणार असल्याचे सरपंच तात्यासाहेब भाडळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात कधीही आणि कोठेही झाला नाही अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत उरुळी देवाची गावचे सरपंच तात्यासाहेब भाडळे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरवस्था झाली आहे. यातून झालेल्या अपघातांत अनेक निष्पाप बळी गेले आहेत. याबाबत पत्रव्यवहार, आंदोलने, निवेदने देऊनही अधिकाऱ्यांना जाग येत नाही. यातूनच संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निकृष्ट व धोकादायक रस्ता म्हणून बाह्यवळण मार्ग ओळखला जाऊ लागला आहे. यासाठी उरुळीकरांनी या मार्गाच्या नावे “निकृष्ट रस्ता पुरस्कार’ संबंधित अधिकाऱ्यांना देऊन गौरव करण्याचे ठरविले आहे.
अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये उभे करून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार म्हणून तीन हजार रुपये किमतीचे तिरडीचे साहित्य भेट देण्यात येणार आहे. पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्यानंतर तरी यातून प्रेरणा घेत बांधकाम खात्याचे अधिकारी काम करतील, अशी उपहासात्मक अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
बाह्यवळण मार्गाचे काम एक आठवड्यात सुरू होईल, असे ठोस आश्वासन एक महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिले होते. परंतु, एक महिना उलटला तरी कॉंक्रिटीकरणाचे काम नव्हे परंतु, साधा खड्डाही बुजविला गेलेला नाही, अधिकाऱ्यांच्या अशाच वृत्तीमुळे ग्रामस्थांनी संतापातून आता पुरस्कार वितरणचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच भाडळे यांनी सांगितले.
मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गाचे काम पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. गेली एक वर्ष तर काम बंद आहे. कॉंक्रिटीकरणाच्या नावाखाली बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्तीसाठी एक रुपयाही दिलेला नाही.
– सचिन घुले, मा. उपसभापती, हवेली पंचायत समिती
कॉंक्रिटीकरणाचे काम काही प्रमाणात तरी होणे गरजेचे आहे. किमान, ज्या-ज्या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या-त्या ठिकाणी तरी रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी. अन्यथा, तीव्र जनआंदोलन करण्यात येईल.
– उल्हास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना