औरंगाबाद – देशात एकीकडे करोना संसर्ग थैमान घालत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या स्थितीतही वैद्यकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना बर करत आहेत. मात्र आता म्युकरमायकोसिस आजाराने डोक वर काढलं असून करोनामधून सुटले तरी रुग्ण या रोगाचे शिकार होत आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसने १६ रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे.
शहरात दीड महिन्यात या आजाराचे 201 रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांना चिंता सतावत आहे.
शरहरात करोनामुक्त झालेल्यांची संख्या मोठी आहे. मात्र ज्यांना करोनाचा जास्त त्रास झाला त्यांना आता म्युकरमायकोसिसचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांकडून म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांची माहिती मागविली आहे. त्यानुसार शहरातील सहा रुग्णालयांनी माहिती पाठवली आहे.
यापैकी ‘एमजीएम’मध्ये 73, एशियन हॉस्पिटलमध्ये 24, कमलनयन बजाजमध्ये 5, धूत हॉस्पिटलमध्ये 3, एपेक्स हॉस्पिटलमध्ये 43, तर घाटी रुग्णालयात 50, रुग्ण दाखल झाले आहेत. यापैकी मधुमेही रुग्णांची संख्या 76, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या 110, स्टेरॉइडचे रुग्णांची संख्या 148 आहे.