नवी दिल्ली : देशात करोनाचा हाहाकार अजूनही सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. बुधवारी भारतात करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत 934 इतकी भर पडली. या संख्येमुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या 47 हजार 65 इतकी झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. ही वाढ देशाच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताआधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सीकोचा क्रमांक लागतो. 13 दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावर पोहचला होता. दररोज होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे भारत आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, भारतात 47 हजारांपेक्षा जास्त जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ब्रिटनमध्ये 46 हजार 706 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी भारताने ब्रिटनला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारताचा मृत्यूदर फक्त दोन आहे. तर यूकेचा मृत्यूदर 14.9 टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी चौथ्या स्थानी असलेल्या ब्रिटनलाही भारतानं मागे सोडलं आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 46 हजार 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत अमेरिका (1 लाख 68 हजार 219), ब्राझील (एक लाख 3 हजार 99), मेक्सिको (56 हजार 929) आणि चौथ्या स्थानी भारत आहे.